शबनम न्युज | मुंबई
‘महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे,’ असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर रोजी ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने दादर चैत्यभूमी, आणि मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत विविध स्थळांच्या ठिकाणी दर्शन व्यवस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील मध्यवर्ती व्यवस्था याठिकाणी जय्यत सुरू आहे. या तयारीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, अविनाश महातेकर, रामभाऊ पंडागळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आए.एस. चहल, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. एच. के. गोविंदराज, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे तसेच शासनाचे विविध विभाग, मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, भिक्खू संघ आणि महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.