माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत एक हजार विद्यार्थी आणि शिक्षकांना विविध वृक्षांच्या बिया वाटप
पिंपळे सौदागरमधील 12 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपळे सौदागर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमांतगर्त पिंपळे सौदागरमध्ये वृक्ष संवर्धनाबाबत उन्नती सोशल फाउंडेशन आणि गुरु फाउंडेशन यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पिके इंटरनेशनल स्कुल येथील शाळेतील एक हजार मुलं आणि शिक्षकांना विविध वृक्षांच्या बियांचे वाटप करण्यात आले. यात अर्जुन, सावर, शिवण आणि सीताफळ बियांचा समावेश आहे. शासकीय जागेवर विविध वृक्षांच्या बियांचे रोपण केले जाणार आहे.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे, संस्थापक संजयशेठ भिसे, गुरु फाउंडेशनचे संस्थापक डॉ. दीपक जोशी, पिके इंटरनॅशनल स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे, प्राध्यापिका धनश्री सोनवणे, ईशा पटेल, दक्ष जोशी आणि शाळेचे कर्मचारी, विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
डॉ. दीपक जोशी म्हणाले, शालेय अवस्थेतच मुलांमध्ये वृक्षांविषयी आपुलकी, प्रेम वाढावे. त्यांच्याविषयी मुलांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी उन्नती सोशल फाउंडेशन आणि गुरु फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा उपक्रम संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात राबवित आहोत. ‘शंभर शाळा, एक लाख मुलं आणि दहा लाख वृक्षांचं रोपण’ हा उद्देश समोर ठेवून आम्ही त्यासाठी कार्यरत आहोत. पिंपळे सौदागरमधील पिके इंटरनेशनल स्कुल येथे या मोहिमेचा आज शुभारंभ झाला. परिसरातील जवळपास बारा हजार मुलांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. त्यांना अर्जुन, सावर, शिवण आणि सीताफळ या झाडांच्या बिया देऊन त्याचे रोपण आणि संवर्धन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘माझी माती माझा देश’ या अंतर्गत १५ ऑगस्ट २०२३ पासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून वर्षभर म्हणजेच १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वृक्ष संवर्धन आणि लागवडीसाठी जनजागृती करणार आहोत.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या उक्तीनुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. त्यांच्या ‘माझी माती, माझा देश’ या संकल्पनेनुसार आम्ही वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला आहे. स्मार्ट पिंपळे सौदागरला हिरवाईने नटविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध झाडांच्या बिया शाळेतच मुलांना वाटप करून त्यांना झाङे लावण्यासाठी प्रोत्साहित करीत आहोत. या उपक्रमात परिसरातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्यने सहभाग घ्यावा, असे आवाहन करीत आहे.
पिके इंटरनॅशनल स्कुलचे संस्थापक जगन्नाथ काटे म्हणाले, वृक्ष लागवडीची चळवळ बालवयातच रुजवली गेली पाहिजे. त्यामुळे चांगला समाज आणि प्रगतशील पिढी निर्माण होते. सध्या वायू प्रदूषणाचा पृथ्वीला विळखा पडला आहे. वाहनांची संख्या वाढली आहे. प्लास्टिकचा अतिरेकी वापर सुरु आहे. यामुळे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत जात असल्याने ऑक्सिजनचे प्रमाण घटत चालले आहे. याचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन हा एक महत्वाचा विषय आहे. यात सर्वांनी रस घेऊन वृक्ष लागवड केली पाहिजे. येणा-या काळात पृथ्वीला प्रदुषणापासून वाचवायचे असेल तर नवीन पिढीला वृक्ष लागवडीचा संदेश दिला पाहिजे. माझी माती माझा देश उपक्रमातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे मिळत असल्याने उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी होत आहे.