शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुणे, : ‘समग्र सृष्टीचे कल्याण आणि माइंडफुल लिव्हिंग’ या विचारधारेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘स्वास्थ्यम्’ पुस्तकाचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुखाचा शोध आपण सगळेच घेत असतो. आध्यात्मिक साधना करणाऱ्या श्री एम, श्री श्री रविशंकर, कमलेश पटेल आदींची वचने आणि त्यांचे मार्गदर्शन या पुस्तकात आहे. जीवनाच्या सार्थकाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. पुढील वर्षी आठ मार्चला हे पुस्तक उपलब्ध होईल. त्याची पूर्वनोंदणी सध्या सुरू आहे. त्याचे प्रकाशन ‘स्वास्थ्यम्’च्या निमित्ताने करण्यात आले.
आध्यात्मिक व योग गुरू श्री एम यांचे ‘उपनिषद’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. त्याला कार्यक्रमाला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. “तपस्येचा अर्थ आध्यात्मिक उष्मा असा होतो. खरेतर कर्मयोग हीच तपस्या आहे. आजच्या कलियुगात एका पायावर उभे राहून कठोर तपस्या करणे शक्य नाही, तर दुसऱ्याला आपल्याकडील काहीतरी देणे हीच खरी तपस्या ठरेल. सर्वांत मोठी तपस्या म्हणजे त्याग होय,” असे प्रतिपादन आध्यात्मिक गुरू श्री एम यांनी केले.
‘स्वास्थ्यम्’च्या पहिल्याच दिवशी त्यांनी उपनिषदांवर भाष्य केले. उपनिषदे केवळ संन्याश्यांसाठी नसून प्रापंचिकांसाठी असल्याचेही त्यांनी सांगितले. वेदांमध्ये मंत्रानंतर उपनिषदे सुरू होतात. सर्वांत महत्त्वाचा वेद म्हणजे सामवेद, कारण श्रीकृष्णाने स्वतःचे वर्णनच सामवेदाने केले आहे. सामवेदात सर्वांत महत्त्वाचे उपनिषद म्हणजे केनोपनिषद. आपण कोण आहोत, कोठून आलात, याप्रश्नाचे उत्तर त्यात आहे.उपनिषदांची निर्मिती आणि पार्श्वभूमीसंबंधी श्री एम यांनी मांडणी केली.
ते पुढे म्हणाले की , “उपनिषदांमधील एकही ऋषी संन्यासी नाही. त्यामुळे उपनिषदे फक्त संन्याश्यांसाठी असल्याचा गैरसमज तोडायला हवा. अनेक वर्ष उपनिषदांना लपवून ठेवले होते. आता याला सर्वांपर्यंत पोहोचविण्याची वेळ आली आहे. वेदांचा अर्क असलेली उपनिषदे लोकांना समजायला हवीत.” वेदांचा अंतिम भाग म्हणजे उपनिषदे असून, पहिली ११ उपनिषदे प्रमुख आहेत. त्यांची चर्चा ‘स्वास्थ्यम्’मधील दोन सत्रांतून होणार आहे.