शबनम न्युज | मुंबई
आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत अंगणवाडी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आत्ताच्या सरकार पेक्षा खेकडा बरा आहे, अशी टीका करत क्रांतीज्योती, क्रांतीसुर्य महात्मा ही बिरुद लावू शकू अशी माणसेच राहिलेली नाहीत, असेही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
ते म्हणाले, सावित्रीच्या लेकी आज इथे आलेले आहेत, पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण करतोय, त्यांच्या ज्योती तुमच्यात तेवतात की नाही? हा प्रश्न आहे असंख्य ज्योती एकत्र आल्या की त्यांची मशाल पेटते. ती मशाल कुणाचीही सत्ता जाळून खाक करू शकते. तुमच्या हातामध्ये ताकत आहे जे हात जनतेची सेवा करतात त्यांनी टाळ्या वाजवल्यावर इतका आवाज येतो, हा आवाज सरकारच्या कानाखाली मारली तर केवढा मोठा येईल? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात विचारला आहे.
तसेच 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. मग तुम्ही राम भक्त नाही का? मध्य प्रदेशात भाजपाने निवडणूक जिंकली. सगळ्यांचा होरा होता की मध्य प्रदेशात भाजपा हरणार पण ते जिंकले. जिंकल्यानंतर त्यांनाच कळलं नाही ते कसे जिंकले. पण लाडली बहीण ही योजना भाजपाला लाभली. मग आमच्या लाडल्या बहीण आहेत ना. राम भक्त आहेत. मग त्यांचं काय? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. सरकार गेलं नसतं तर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते निर्माण झाले नसते, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. आत्ताचे जे सरकार आहे त्यांच्यापेक्षा खेकडा बरा, इतकं हे सरकार तिरकं आहे .आम्हाला तिघाडा सरकार म्हणत होते, आता यांचं काय झालं आहे ते बघा. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.