शबनम न्युज। मुंबई
काल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वरळी मुंबई येथे महा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या घटनेचे पुरावे सादर केले, तसेच विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावरही त्यांनी आरोप केले. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.
काल महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, मागच्या आठवड्यात लबाडाने जो निकाल दिला, नाही नाही लवादाने जो निकाल दिला, त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. आता सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहेत तसेच आता जनतेच्या न्यायालयात आम्ही आलो आहोत. राहुल नार्वेकर आणि मिंध्यांनी माझ्यासमोर उभे राहावं आणि सांगावं शिवसेना कुणाची, पोलिस संरक्षण न घेता जाहीर करा, मग कुणाला पुरावा, गाढवा आणि तुडवावा ते जनता ठरवेल.
यानंतर प्रतिक्रिया देत राहुल नार्वेकर पत्रकार परिषदेत म्हणाले, शिवसेनेच्या उबाठा गटाने काल पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं पत्रकार परिषद घेणार, पण यांनी तर छोटा दसरा मेळावाच घेतला. त्याला गल्लीबोळातली भाषणांची मालिका म्हणावं लागेल. खरंतर माझी अपेक्षा होती की या पत्रकार परिषदेतून किंवा या मेळाव्यातून माझ्याकडून काही घटनाबाह्य झालंय का ते दाखवलं जाईल. कदाचित माझ्याकडून काही चुकीचं कृत्य किंवा माझ्या निर्णयात काहीतरी चुकीचं झालं होतं का? घटनाबाह्य झालेलं का? नियमबाह्य झालेलं का? असं काहीतरी दाखवलं जाईल. परंतु, तिथे केवळ राजकीय भाषणं झाली. तसेच केवळ संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरले गेले, शिविगाळ केली गेली. याव्यतिरिक्त काहीच झालं नाही.
ठाकरे गटाने राज्यपालांना फालतू माणूस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाबद्दल अपशब्द वापरले, विधानसभा अध्यक्षांवरचं त्यांचं प्रेमही दिसलं. निवडणूक आयोगाला चोर म्हणाले, हे सगळं दुर्दैवी आहे. कुठलाही आधार असो अथवा नसो, संविधानिक संस्थांविषयी असे शब्दप्रयोग करणं लोकशाहीसाठी घातक आहे. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष अशा कोणत्याही संवैधानिक पदावर, संस्थेवर यांचा विश्वास नाही.