शिक्षण, पत्रकारिता समाजाला दिशादर्शक असावे
परिसंवादात मान्यवरांचा सूर
पुणे : शिक्षण आणि पत्रकारिता ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांना पूरक आहेतच; शिवाय ते दोन्ही समाज घडविण्याचे काम करतात. औपचारिक शिक्षणातून विद्यार्थी घडत जातो. अनौपचारिक शिक्षणातून माणूस व समाज घडतो. त्यामुळे सर्वांगीण शिक्षणावर भर द्यायला हवा. प्रत्येकाने आपली मूल्ये जपत कर्तव्य भावनेतून कार्य करायला हवे,” असा सूर परिसंवादात उमटला.
मराठी पत्रकार दिन, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकारिता सप्ताहाचा समारोप, ‘सर्वांगीण शिक्षण व पत्रकारिता’ या विषयावर परिसंवाद आणि ‘सूर्यदत्त सूर्यभारत पत्रकारिता सन्मान २०२४ʼ सोहळ्यात पुण्यातील विविध दैनिकाच्या संपादकांनी आपले विचार मांडले.
पत्रकार भवन येथे झालेल्या सोहळ्यात लोकमतचे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी, भास्करचे समूह संपादक प्रकाश दुबे, आज का आनंदचे संपादक आनंद अग्रवाल, सामनाचे सहसंपादक अरुण निगवेकर, प्रभातचे संपादक अविनाश भट, पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे, राष्ट्रसंचारचे संपादक अनिरुद्ध बडवे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया, संचालक प्रशांत पितालिया, सल्लागार मंडळ सदस्य जीवराज चोले आदी उपस्थित होते.
मनोज रानडे (सामना), शैलेश काळे (आज का आनंद), लक्ष्मण मोरे (पुणे टाइम्स मिरर), राजू हिंगे (लोकमत), मीनाक्षी गुरव (सकाळ), हर्ष दुधे (महाराष्ट्र टाइम्स), विजय चव्हाण (केसरी), गणेश खळदकर (पुढारी), निलेश चौधरी, (पुण्यनगरी), सलोनी मिस्त्री (टाइम्स ऑफ इंडिया), शिवराज सणस (आकाशवाणी), योगेश बोरसे (टीव्ही ९ मराठी), अमोल धर्माधिकारी (लोकशाही न्यूज), सचिन जाधव (साम टीव्ही), सागर आव्हाड (झी २४ तास), मंगेश फल्ले (दिव्यमराठी), व्यंकटेश भोळा (प्रभात), उद्धव धुमाळे (लोकमत), यशवंत सिंह (नवभारत), प्रतीक्षा पारखी (एनडीटीव्ही), सोनाली भालेसईन (पोलिसनामा), प्राजक्ता जोशी (इंडी जर्नल), सारिका रोजेकर (राष्ट्रसंचार), अभिजित दराडे (महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन), ज्ञानेश्वर चौतमल (पुढारी न्यूज), प्रतीक गंगणे (पुणे प्रहार) यांना ‘सूर्यदत्त सूर्यभारत पत्रकारिता सन्मान २०२४ʼ देऊन गौरविण्यात आले.
श्रीधर लोणी म्हणाले, “लोकशिक्षण हा पत्रकारितेचा मूळ गाभा हा आहे. शिक्षणामुळे विषमता दूर होण्याची संधी मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये खासगी शिक्षण संस्थांची संख्या वाढली आहे. खासगी शिक्षण संस्थांमुळे शिक्षणासा प्रसार झाला आहे. मात्र, शिक्षण महाग झाले आहे. त्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, अशांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जीडीपीच्या सहा टक्के शिक्षणावर खर्च करण्याची गरज आहे.”
संजय आवटे म्हणाले, “शिक्षण आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांचे सार्वत्रीकरण झाले आहे. सद्यस्थिती लक्षात घेता माध्यमांनी आणि पत्रकारांनी दक्ष राहून काम केले पाहिजे. समाजाभिमुख पत्रकारितेची आज गरज भासते आहे. आभासी जगात, फेक न्यूजच्या जमान्यात आपण काम करतो आहोत. अशावेळी अधिक सजगपणे नीतिमूल्यांशी तडजोड न करता निर्भीडपणे आपण भूमिका मांडत राहिले पाहिजे. समाजाला दिशा देणाऱ्या, युवा पिढीला सर्वांगीण पद्धतीने घडवणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन द्यायला हवे.
प्रकाश दुबे म्हणाले, “बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे संपादक आणि पत्रकारांवर गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे अनेक गंभीर घटनांची दखल घेतली जात नाही. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने या क्षेत्रावर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. त्यातूनच निर्भयपणे निर्भीड पत्रकारिता होऊ शकेल आणि समाजाच्या असंख्य समस्याना वाचा फोडता येईल.”
आनंद अग्रवाल म्हणाले, “शिक्षण तुम्हाला वैयक्तिक आणि सामाजिक उत्कर्षाची संधी देते. सर्वांगीण शिक्षण घेतले, तर कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशाकडे वाटचाल करता येते. पत्रकारितेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव घ्यावा. सर्वांगीण विकासाचे दर्जेदार शिक्षण देण्याचा ध्यास घेऊन २५ वर्षे सूर्यदत्त संस्था कार्यरत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पत्रकार हा लोकशाहीचा एक खांब असल्याचे आपण मानतो. चांगल्याला प्रोत्साहन आणि वाईटावर प्रहार करणारी पत्रकारिता समाजाच्या हिताची ठरते. सूर्यदत्त संस्थेच्या गेल्या २५ वर्षांच्या प्रवासात माध्यमांनी दिलेले प्रोत्साहन मोलाचे राहिले आहे. सर्वांगीण विकासाचे व वैश्विक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना सर्वार्थाने घडविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. पत्रकार दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्तमध्ये पत्रकारिता सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यातून विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टी शिकता येतात. आंतरशाखीय शिक्षणावर आम्ही भर देत आहोत. या प्रवासात आपल्या सर्वांचे सदैव सहकार्य असते. वृत्तपत्र वाचन हा तरुणांच्या, नागरिकांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग व्हायला हवा. तसेच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी माध्यमांचे महत्व, त्यांची ओळख करून घ्यायला हवी.”
प्रशांत पितालिया यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.