शबनम न्यूज | मुंबई
काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत दिलेला निकाल हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क व्यक्त होत असताना, दुसरीकडे उल्हासनगर मध्ये एका पोलीस स्थानकात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचा मुद्दाही तापला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी कर्जत मध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक शब्दात टिप्पणी केली.
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, पूर्वी पोलीस स्थानकात जाण्याची प्रथा नव्हती. फार तर असं सांगितलं जायचं की, योग्य तो न्याय करा, पण आता पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार केल्याशिवाय न्याय मिळत नाही, अशी भाजपाच्या एका आमदाराची खात्री झाली आहे. हा आमदार पोलीस स्थानकात जातो, पाच गोळ्या झाडल्या असं माध्यमांना ठामपणे सांगतो. ज्याला गोळी लागली तो आहे की गेला, कळायला मार्ग नाही. त्यावर चर्चा नाही. ज्याला गोळी लागली, तो सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा पदाधिकारी होता. त्यांच्यावर भाजपाच्या आमदाराने जाऊन गोळ्या झाडल्या. एवढी गंभीर घटना आहे. गोळी झाडणारे आमदार म्हणतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, ते भाजपासोबतही गद्दारी करणार आहेत. त्यांनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केलं, ते मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यात फक्त गुन्हेगार पैदा होतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात गुंड घडवण्याचं काम मुख्यमंत्री करत आहेत.. त्यांनी माझे कोट्यवधी रुपये खाल्ले. त्यांनी व त्यांच्या मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे. हे आम्ही म्हणत नाही तर 105 आमदार असणाऱ्या पक्षाचा एक आमदार गोळीबार केल्यानंतर म्हणत आहे. याची चौकशी व्हायला पाहिजे की नाही? किमान करोडो रुपये खाल्ले, याची तरी चौकशी करा, अशी मागणी देखील जयंत पाटील यांनी केली आहे.