शबनम न्युज | पुणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. दरम्यान, बारामतीत बोलताना त्यांनी थेट पवार कुटुंबावर भाष्य केले. मला एकटं पाडलं जाईल. तुम्हाला भावनिक केलं जाईल. पण भावनिक झाल्यामुळे पोट भरत नाही. रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही, असे अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर आता खुद्द शरद पवार यांनीच भाष्य केले आहे. मतदारांना भावनिक करण्याचा प्रश्नच नाही. अजित पवार हेच लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा पलटवार शरद पवार यांनी केला. ते पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
शरद पवार म्हणाले, “एखाद्या उमेदवाराला मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे. त्या दृष्टीने त्यांनी काही केले असेल तर हरकत नाही. पण एका कुटुंबातील संपूर्ण लोक एका बाजूला आहेत आणि मीच एकटा आहे असे सांगणे म्हणजे भावनिक भूमिका मांडून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न यातून दिसत आहे,” असे शरद पवार म्हणाले.
“भावनात्मक आवाहन करण्याचे कारण नाही. कारण बारामती मतदारसंघाचे लोक आम्हा लोकांना वर्षानुवर्षे ओळखतात. तेव्हा आम्हाला भावनिक आवाहन करण्याची गरज नाही. पण विरोधकांची भूमिका मांडण्याची पद्धत, त्यांची भाषणं काहीतरी वेगळंच सांगत आहेत. त्याची नोंद बारामतीचा समस्त मतदार घेईल. योग्य तो निर्णय घेईल,” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.