देशाच्या विकासासाठी बौद्धिक संपदेचे संरक्षण गरजेचे
अनुजा बापट यांचे मत; ‘एमएसएमई’ मंत्रालय व एआयसी पिनॅकल यांच्या वतीने राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रा
पुणे : “भारत हा प्रतिभावान व बुद्धीवानांचा देश आहे. भारतीयांमध्ये नवकल्पना व सर्जनशीलता उपजत आहे. मात्र, या बौद्धिक संपदेचे (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी-आयपी) अधिकार संरक्षित होत नाहीत. देशाच्या विकासासाठी बौद्धिक संपदेचे संरक्षण गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या ‘एमएसएमई’ मंत्रालयाकडून आयपी, पेटंट, कॉपीराईट नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे,” असे केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या उप महासंचालक अनुजा बापट यांनी नमूद केले.
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बौद्धिक संपदा (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी – आयपी राईट्स) यात्रेच्या उद्घाटनावेळी अनुजा बापट बोलत होत्या. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (एमसीसीआयए) सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरमचे अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता, ‘एमएसएमई’चे (तंत्र व प्रकल्प) संचालक विनम्र मिश्रा, निवृत्त वरिष्ठ पेटंट सहनियंत्रक डॉ. के. एस. कर्दम, एआयसी पिनॅकल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते.
या यात्रेमध्ये ‘वैश्विक दृष्टीकोनातून बौद्धिक संपदा’वर डॉ. नितीन तिवारी, ‘प्रोटेक्टिंग युअर ब्रँड’वर श्रीधर परुंडेकर, ‘इंटरनॅशनल प्रॅक्टिसेस ऑन आयपीआर’वर के. एस. कर्दम, डॉ. सुधा कन्नन, डॉ. बी. पी. सोमह, वेदांत पुजारी, डॉ. मोहन दिवाण, परवेज कुड्रोली, ‘आयपीआरचा व्यवसाय वृद्धीवर होणारा परिणाम’वर अजित राऊळ, ‘व्यवसायवाढ आणि स्पर्धात्मकतेसाठीची बौद्धिक संपदा, खोट्या जाहिराती, उल्लंघनाच्या समस्या आणि आव्हाने’वर डॉ. नितीन तिवारी, श्रीधर परुंडेकर, शैलेंद्र भंडारे, ऍड. ऋतुजा मेहेंदळे फडके, तर ‘एआयसी-पिनॅकल आयपी फॅसिलिटेशन सेंटर व बौद्धिक संपदा नोंदीची प्रक्रिया’वर ऍड. पूनम नहार यांनी मार्गदर्शन केले. एमएसएमई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, आयपी प्रॅक्टिस करणारे वरिष्ठ व्यासायिक, विधिज्ञ, यशस्वी स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते.
अनुजा बापट म्हणाल्या, “औद्योगिक व आर्थिक विकासात ‘एमएसएमई’चे योगदान मोठे आहे. इनोव्हेशन व संशोधनाची जोड मिळाल्याने हे छोटे उद्योग क्रांतिकारक कामगिरी करत आहेत. यांच्या इनोव्हेशन व संशोधनाचे अधिकार संरक्षित करण्यासाठी, तसेच आयपी, पेटंट, कॉपीराईट नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालयामार्फत अनेक योजना आणल्या जात आहेत. जनजागृतीसाठी आयपी यात्रेचे आयोजन केले जात आहे.”
डॉ. सुधीर मेहता म्हणाले, “बुद्धिवंतांचे शहर असलेल्या पुण्यात मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन होत आहे. याचे संरक्षण करण्यासाठी या बौद्धिक संपदेची नोंद होणे गरजेचे आहे. बौद्धिक संपदेच्या हक्कांबाबत जागृती, सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन, कल्पना आणि इनोव्हेशनचे संरक्षण, प्रगत तंत्रज्ञान अंतर्भूत करून एमएसएमई सक्षम होण्यास यामुळे मदत होईल.”
विनम्र मिश्रा म्हणाले, “बौद्धिक संपदेची नोंदणी करण्याची मानसिकता वाढली आहे. स्टार्टअप्सना देखील एमएसएमईकडे आपले हक्क नोंदवता येणार आहेत. देशातील २० वेगवेगळ्या शहरांतून ही आयपी यात्रा आयोजित करून बौद्धिक संपदेच्या हक्कांबाबत जागृती केली जात आहे. आयपी नोंदणीसाठी ८० पेक्षा अधिक सुविधा केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.”
डॉ. के. एस. कर्दम म्हणाले, “काही वर्षांपूर्वी पेटंटबद्दल भारतीयांमध्ये अनभिज्ञता होती. जपान, अमेरिका, चीन यांसारखे देश बौद्धिक संपदेच्या संरक्षित हक्कांच्या जोरावर विकसित झाले आहेत. आपल्याकडे अलीकडच्या याबाबत जागरूकता निर्माण होत असून, अनेक छोटे-मोठे व्यवसाय आयपी व पेटंट नोंद करत आहेत.”
सुनील धाडीवाल यांनी स्वागत प्रास्ताविक केले. श्रद्धा सप्तर्षी यांनी सूत्रसंचालन केले