पुणे : “भावी काळातील जागतिक नेतृत्व तंत्रज्ञानाच्या कुशल वापरातून पुढे येणार आहे. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केल्यास, समाज व देशाचे शोषणमुक्त सक्षमीकरण सहज शक्य आहे’, असे प्रतिपादन केंद्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले. ‘तंत्रकुशल विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही युगात देशाच्या विकासप्रक्रियेत याच जाणीवेतून योगदान द्यावे’, असे आवाहनही डॉ. काकोडकर यांनी केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एआयटी) ३० व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून डॉ. काकोडकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. काॅलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडंट लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांच्या हस्ते डॉ. काकोडकर यांना गौरवण्यात आले. प्रसंगी एआयटीचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, एआयटीचे अध्यक्ष मेजर जनरल टी. एस. बेन्स, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिवजयंतीचे औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, तसेच सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.
लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश म्हणाले, “विकासाच्या वाटेवर गतीने जाणाऱ्या आपल्या देशासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. जागतिक स्तरावरील वास्तव तंत्रज्ञानाचे महत्त्व सातत्याने वाढणार असल्याचे स्पष्ट करत आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचे प्राबल्य असणार आहे. शाश्वत विकासाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी आपली तंत्रकुशलता घेऊन वाटा उचलण्याच्या असंख्य संधी आहेत. नव्या जगात कौशल्ये, तंत्रस्नेही वावर आणि शहाणपण, यांच्या एकत्रीकरणातून ज्ञानाचे मार्ग निर्माण होणार आहेत.”
ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे सादरीकरण केले. ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा अभ्यासक्रम लवकरच सुरू करत असल्याचे ते म्हणाले. संस्था स्वायत्ततेच्या दिशेने जात असून, प्लेसमेंटचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक असल्याचा उल्लेख त्यांनी केला.