शालेय वयातच मुलांना मैदानी खेळ, वाचनाची सवय लागावी रवींद्र धंगेकर यांचे मत
पुणे : “पालकांनी आपल्या पाल्यांना मैदानी खेळ खेळण्याची, वाचनाची सवय शालेय वयापासूनच लावायला हवी. मोबाईल, इंटरनेटचा गरजेपुरता वापर करायला द्यावा. व्यसनांच्या आहारी जाण्यापासून मुलांना रोखावे. शहरात अमली पदार्थांची विक्री वाढली आहे. ही बाब भावी पिढीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे अशा प्रकारांनाआळा घालण्यासाठी आपण सर्वानी जागरूक राहायला हवे. असे गैरप्रकार पोलिसांच्या नजरेस आणून द्यावेत,” असे मत आमदार रवींद्र धंगेकर यांनी यांनी व्यक्त केले.
श्री देशमुख महाराज फाऊंडेशन पुणे, डी. एम. फाउंडेशन व पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय निबंध आणि सूर्यनमस्कार स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निग स्कूलच्या सभागृहात पार पडला. या समारंभावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पॉवर लिफ्टर डॉ. अरुण दातार, श्री विजय देशमुख महाराज, पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर, आंतरराष्ट्रीय पावर लिफ्टर शाम सहानी, महिला काँग्रेस शहराध्यक्ष पूजा आनंद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ऍड. गणेश सातपुते, संत साहित्याच्या अभ्यासक आरती दातार, योग अभ्यासक सुनील रोटी, फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष सुवर्णा बालेघाटे आदी उपस्थित होते. गेल्या १७ वर्षांपासून विविध स्पर्धांचे आयोजन हे फाउंडेशन करत आहे. श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन समारंभास सुरुवात झाली.
सूर्यनमस्कार स्पर्धेमध्ये मुलांच्या मोठ्या गटात (आठवी ते दहावी) प्रियदर्शनी विद्यामंदिर शाळेने, तर मुलींच्या मोठ्या गटात कर्मवीर भाऊराव हिरे शाळेने प्रथम क्रमांक पटकवला. वामनराव ओतूरकर शाळा व माधव सदाशिवराव गोळवलकर विद्यालयाने मुलींच्या व मुलांच्या गटात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. लहान गटात (पाचवी ते सातवी) मुले व मुलींमध्ये नवमहाराष्ट्र प्राथमिक विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक मुलांमध्ये प्रियदर्शनी विद्यामंदिर शाळेने, तर मुलींमध्ये नवमहाराष्ट्र विद्यालयाने पटकावला. तृतीय क्रमांक मुले व मुलींमध्ये प्रगती विद्यालयाने पटकावला.
निबंध स्पर्धेमध्ये मोठ्या गटात (आठवी ते दहावी) वामनराव ओतूरकर शाळेच्या अनुष्का देशमुख हिने प्रथम, विश्वकर्मा विद्यालयाच्या श्रुतिका मोरे हिने द्वितीय, तर पुणे केब्रिज पब्लिक स्कुलच्या गौरव साळवे याने तृतीय क्रमांक पटकावला. लहान गटात (पाचवी ते सातवी) प्रियदर्शनी विद्यालयाच्या जान्हवी गलांडे हिने प्रथम, विश्वकर्मा विद्यालयाच्या अंतरा गायकवाड हिने द्वितीय आणि नवमहाराष्ट्र इंग्लिश स्कुलच्या स्नेहल माळी हिने तृतीय क्रमांक पटकवला. सूर्यनमस्कर स्पर्धेचे परीक्षण मनोज साळी, तर निबंध स्पर्धेचे परीक्षण सुनिता अनारसे, धनश्री लोणकर, प्रतिभा साखरे यांनी केले.
देशमुख महाराज यांनी सामारंभाचा शेवट स्पर्धेचे महत्व सांगून आणि विद्यार्थ्यांना ‘मोबाईल वापरणे आवश्यक असले तरी त्याच्या आहारी जाऊ नये.’ असा संदेश देऊन केला. ते म्हणाले, “मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी गेल्या १७ वर्षांपासून सूर्यनमस्कार व निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा, हा यामागील उद्देश आहे. निबंध स्पर्धेत तीनशेपेक्षा अधिक, तर सूर्यनमस्कार स्पर्धेत ६०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.”