शबनम न्युज | पुणे
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता कोणता नेता भाजपमध्ये जाणार यावर राज्यात चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ‘विश्वजित, लवकरच तुझाही मुहूर्त लावतो’, असे फडणवीस यांनी विश्वजित कदम यांना म्हटल्यानंतर सर्वसामान्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान फडणवीस यांच्या या वक्तव्यावावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी सडकून टीका केली आहे. कदम यांना ‘तुझाही मुहूर्त लावतो’ म्हणणाऱ्या
भाजपमध्ये अंतर्गत मोठी नाराजी आहे. त्यामुळे भाजप बळकट होण्याऐवजी कमकुवत होत आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आदी पक्षातील लोकांना फोडण्याचे काम सुरु आहे. ड्रग्ज प्रकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, दुष्काळजन्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असूनही त्याकडे लक्ष देण्याऐवजी सत्तेसाठी पक्ष फोडाफोडीचे घाणेरडे राजकारण भाजपकडून सध्या सुरू आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वे अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, अशी नैतिकता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात झालेल्या अनेक हिंसक आणि गुन्हेगारी घटनांनंतर का दाखविली नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
देशात ४०० पार, तर राज्यात लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याच्या वल्गना भाजप नेते करत आहेत. परंतु, त्यांना हा अतिआत्मविश्वास येत्या निवडणुकीत नडणार आहे. एवढे मोठे आकडे सांगूनही इतर पक्षातील नेत्यांना तपास यंत्रणाची भीती दाखवून भाजपमध्ये का आणावे लागत आहे, याचे आत्मचिंतन फडणवीसांनी आणि भाजपने केले पाहिजे. येत्या निवडणुकीत भाजपला जनता सत्तेतून खाली खेचणार असल्याने व पराभव दिसत असल्यानेच भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
- रोहन सुरवसे-पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस