शबनम न्युज | मुंबई
एकनाथ शिंदेंसोबत ४० शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे सरकार कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे पक्षाला भगदाड पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे देखील पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून मात्र अल्पमतात आलो नसल्याचा दावा केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना आणि एकनाथ शिंदे यांना देखील सुनावलं आहे.
यावेळी बोलताना “आधी नाथ होते आता दास झाले. हिंमत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा. बाळासाहेबांचं नाव वापरू नका”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.
उद्धव ठाकरेंनी यावेळी त्यांची पक्षप्रमुख पदावर निवड झाली तेव्हाची आठवण सांगितली. तेव्हा पक्षांतर्गत नाराजीविषयी बोलताना बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली भूमिका त्यांनी सांगितली. “मी बाळासाहेबांना म्हणालो हे सगळे काय करतायत ते तुम्ही तरी थांबवा. ते मला म्हणाले मी मध्ये नाही पडणार. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे. मग शेवटी तो ठराव मंजूर झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सगळ्यांना विचारलं होतं की हे जे सगळं केलंय, ते तुम्हाला मान्य आहे का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.