शबनम न्युज | पुणे
पुण्याचे वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिट्टी दिल्यानंतर जवळपास वीस दिवसांचा कालावधी होऊन गेल्यानंतर काल वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्यामुळे आता पुणे लोकसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत पहावयास मिळणार आहे. यावेळी मी 55 हजारांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.
वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिट्टी दिल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. पण वसंत मोरे यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी नाकारल्यानंतर ते अपक्ष निवडणूक लढणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र काल त्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मागील 25 वर्षापासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करीत राहिलो त्या कालावधीत पुणे महानगरपालिकेमध्ये तीन वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचे सोने केले. या 15 वर्षाच्या नगरसेवक पदाच्या काळात सत्तेमध्ये नसताना देखील कात्रज प्रभागाचा सर्वांगीण विकास केला आहे. कात्रज प्रभाग हा शहरासमोर रोल मॉडेल ठरला आहे. माझ्याकडून प्रभागात सर्व विकासकामे सुरू होती.
मला उमेदवारी मिळावी, याकरिता महाविकास आघाडीचे नेत्यांना भेटलो. पण मला काही कारणास्तव उमेदवारी मिळाली नाही. मात्र, आज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी देऊन मला काम करण्याची संधी दिली. याबद्दल मी त्यांचा आभारी असून, प्रकाश आंबेडकर यांना समाजातील प्रत्येक घटक मानणारा आहे. त्यामुळे या निवडणुकीत मला अधिकाधिक फायदा होईल, आणि मी किमान 55 हजारांच्या मताधिक्याने निवडून येईल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.