शबनम न्युज | पुणे
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित ‘गंधर्व सुरांची शिलेदारी’ या नाट्य संगीत मैफिलीला दि.६ एप्रिल रोजी चांगला प्रतिसाद मिळाला.
‘मराठी रंगभूमी पुणे’ या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम ‘गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट,पुणे’ या संस्थेने सादर केला.अस्मिता चिंचाळकर,चिन्मय जोगळेकर आणि निनाद जाधव यांनी बहारदार नाट्य पदे सादर केली.
संजय गोगटे(ऑर्गन),अभिजित जायदे (तबला) यांनी साथसंगत केली. वर्षा जोगळेकर यानी कार्यक्रमाचे निवेदन केले. दिप्ती शिलेदार -भोगले यावेळी उपस्थित होत्या. ‘मराठी रंगभूमी, पुणे’ या संस्थेच्या ७५ वर्षाच्या वाटचालीचे दर्शन या मैफलीत घडले.
सौभद्र, मानापमान, सुवर्णतुला या लोकप्रिय नाटकातील पदे सादर करण्यात आली आणि जुना सुवर्ण काळ जणू रसिकांच्या भेटीस आला. दुर्मिळ नाट्यपदे ऐकायची संधी या कार्यक्रमात मिळाली.
शाकुंतल नाटकातील नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संगीत सौभद्र नाटकातील ‘कोण तुज सम सांग मज गुरूराया ‘ , ‘ संगीत स्वयंवर नाटकातील ‘ मम आत्मा गमला ‘. संगीत संशय कल्लोळ , संगीत शारदा मधील मधुरा बिंबा धरा’, कवी अनंत फंदी यांच्या जीवनावरील नाटकातील ‘वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला कुठल्या पुण्यानं ‘ ,’संगीत भावबंधन मधील ‘कठीण कठीण किती पुरुष ह्रदय बाई ‘ संगीत मंदोदरी मधील ‘जय शंकर प्रलयंकर गौरी हर ‘
‘ नाही मी बोलत नाथा ‘ संगीत स्वर सम्राज्ञी’ , संगीत सुवर्ण तुला मधील ‘ धीर धरी भामिनी ‘, ‘ ययाती देवयानी ‘ मधील पद , ‘अभंग पतीत तू पावना , पावना’ सादर करण्यात आले.
‘ सप्त स्वरांच्या विभ्रमाने विसरलो देहभान ‘ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.
हा कार्यक्रम शनिवार,दि.६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०० वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले आणि कलाकारांचा सत्कार केला.