शबनम न्युज | मुंबई
या देशामध्ये कोणतेही रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन शासकीय मालकीचे नाहीत. उलट जिथे भाजपाचे सरकार आहे, त्या राज्यांमध्ये सरकारी गाड्या नाही तर प्रायव्हेट गाडी भाड्याने घेऊन चालवत आहे. एसटी लालपरी ही ग्रामीण भागातील लोकांचे एकमेव दळणवळणाचे साधन आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावांपर्यंत एसटी महामंडळ सेवा देते. एसटी महामंडळ तोट्यात असताना कामगारांचे वेळेवर पगार झाले नाहीत, बोनस वेळेवर मिळाला नाही. पण राज्य सरकारने पहिल्या दिवसापासून सरकारी तिजोरीतून एसटी महामंडळाला मदत देण्याची भूमिका स्वीकारली. कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळावेत, महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजेत, अशी भूमिका राज्य सरकारने सातत्याने मांडली. पण भाजपच्या लोकांनी एसटी महामंडळाला विलीन करा आणि त्यांना सरकारी कर्मचारी घोषित करा, अशी गैवाजवी मागणी घेऊन लोकांना भडकवण्याचे काम केले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.
विलिनीकरणाचा निर्णय सरकारने घेतला असता तर या राज्यामध्ये नगरपालिका आणि इतर महामंडळे आहेत. त्यातील सर्व कर्मचारी आम्हाला सरकारी कर्मचारी घोषित करा, सातवा वेतन आयोग लागू करा, ही मागणी घेऊन पुढे आले असते. या राज्याच्या उत्पन्नाच्या स्रोतांचा विचार करून जरी या मागण्या मान्य केल्या असत्या त्यानंतरही सरकार कर्ज काढूनही त्यांना पगार देऊ शकले नसते, ही सत्य परिस्थिती आहे, अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.
काल सरकारच्या माध्यमातून पगारवाढ आणि वेळेवर पगार व बोनस मिळतील याची घोषणा झाली. कामगार कामावर परतायला सुरुवात झाली आहे. त्यांना कळून चुकले आहे की, आपली दिशाभूल करण्यात आली, त्यामुळे समजुतदारपणे त्यांनी माघार घेतली आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
केंद्रात सरकारी महामंडळे व प्राधिकरणे विकण्याचे धोरण जे राबवत आहेत. देशातील पब्लिक सेक्टर आहेत त्यांचे खासगीकरण करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, हे आता कामगारांच्या ध्यानात आलं आहे.
मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोणत्याही महामंडळाचे खासगीकरण करत नाही. लाल परी आमची आहे. तिला पुनर्जीवित करणे, तोट्यातून बाहेर काढणे त्यासाठी जे काही शक्य असेल ते सरकार करणार आहे. मागच्या अर्थसंकल्पात सरकारने घोषणा केली होती की, आम्ही नवीन गाड्या एसटी महामंडळाला देऊ. सुधारणा करून चांगली सेवा देणे, कामगारांना न्याय मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.