शबनम न्युज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबई, औरंगाबाद आणि बार्शी (जि. सोलापूर) येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला.
पक्षप्रवेश केलेल्या सर्व नव्या सहकाऱ्यांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले तसेच पक्षातील पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अल्पसंख्याक मंत्री तथा मुंबई प्रदेश अध्यक्ष नवाब मलिक, आमदार सतीश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, औरंगाबाद ग्रामीण जिल्हाअध्यक्ष कैलास पाटील उपस्थित होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीतर्फे गंगापूर-खुल्ताबाद या विधानसभा मतदारसंघाचे मतदार अंकुश बाबुराव काळवणे यांनी त्यांच्या समर्थकांसहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत एकलहेरा गावचे उपसरपंच सुदाम अवसरमळ, ग्रा.सदस्य वाल्मिक गांगर्डे, शेवाळे गावचे सरपंच योगेश पाटील, उद्योगपती प्रमोद मनुरकर यांनी पक्षप्रवेश केला.
गंगापूर विधानसभा मतदारसंघ निवडून आणण्यासाठी आपल्याला आता प्रयत्न करायचे आहेत. मी सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करतो. या प्रवेशाने पक्षाला ताकद मिळेल याची खात्री आहे. पुन्हा गंगापूर मतदारसंघ काबीज करण्यात पक्षाला यश येईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
तसेच माजी आमदार विद्याताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई प्रदेश सरचिटणीस संजय आव्हाड यांच्या संयोजनातून भीम आर्मी तथा आझाद समाज पार्टीचे मुंबई अध्यक्ष दिपक हनवते, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, दहिसर विधानसभा अध्यक्ष विश्वास मोरे, महिला प्रमुख प्रियंका वाघमारे, युवा अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई संघटक अक्षय बनसोडे आणि मुंबई उपाध्यक्ष विजय बनसोडे यांचाही पक्षप्रवेश झाला.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार नागेशशेठ चव्हाण तसेच त्यांचे मनसे पक्षातील सहकारी सोमनाथ चव्हाण, पवन श्रीमाळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील महेश साळुंखे, गणेश हजारे, अशोक शिंदे, संदेश कापसे, दिनेश साळुंखे, सोहेल शेख, युवराज वाघमारे, सिद्धू रोटे, असीम खान, विकास जाधव, रोहित वेलदरे (पुणे), गोरोबा कदम (वैराग) यांचाही पक्षप्रवेश झाला.
आपल्या मनोगतात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, बार्शीतील प्रवेशामुळे विधानसभेत चांगली उर्जा निर्माण होईल. मागील विधानसभा निवडणुकांदरम्यान काही जणांनी पक्ष सोडला त्यामुळे हा मतदारसंघ भक्कम करण्याचे आवाहन आहे. त्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा आहे.