शबनम न्यूज : पुणे (०१ जानेवारी २०२२) :- अभिनेते विजय पटवर्धन यांच्या ‘विजय पटवर्धन फौंडेशन ‘ तर्फे ‘निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धा’आयोजित करण्यात आली आहे .पुणे श्रमिक पत्रकार संघात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
यावेळी विजय पटवर्धन , रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले, सौ. वृषाली पटवर्धन , राजू बावडेकर, प्रशांत तपस्वी, अभिजीत इनामदार, धनंजय आमोणकर आणि सहकारी उपस्थित होते .
ही लेखन स्पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे.कथा किंवा लेख किंवा पत्र (स्किट, एकांकिका किंवा नाटक नाही) टाईप करुन vijaypatwardhanfoundation@ gmail.com या मेल आयडिवर किमान १ हजार, जास्तीत जास्त पंधराशे शब्दात 5 फेब्रुवारीच्या आत पाठवायचे आवाहन करण्यात आले . 12 फेब्रुवारी रोजी स्पर्धेचा निकाल जाहिर होईल व बक्षिस समारंभ केला जाणार आहे.
विनोदी लेखन स्पर्धा प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांसाठी प्रमाणपत्र तसेच अनुक्रमे 5 हजार ,३ हजार आणि २ हजार रुपयेअशी पारितोषिके आहेत .
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाममात्र 150 रुपये ठेवण्यात आले आहे . स्पर्धेतून जमा होणारा निधी कलाकारांच्या हितसाठी वापरण्यात येणार आहे
“श्रीनिवास पटवर्धन, हे विजय पटवर्धन यांचे वडिल एक विनोदी लेखक होते आणि त्यांची अनेक पुस्तके आणि लेख प्रसिद्ध आहेत. “निर्मला पटवर्धन” या विजय पटवर्धन यांच्या आई श्रीनिवास पटवर्धन यांना लेखनकार्यात मदत करायच्या. त्या दोघांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही विनोदी लेखन स्पर्धा आयोजित करत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले .
ही लेखन स्पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे. तसेच लेखनाला कोणत्याही विषयाचे बंधन नसणार आहे. मात्र, त्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय सलोखा बिघडवणारी अथवा जात, धर्म, प्रांत, भाषा, वेष आदी संवेदनशील मुद्यांबाबत वाद निर्माण करतील अशा आशयाची विधाने असू नयेत,असे आवाहन करण्यात आले . फाउंडेशन ने कोविड साथीच्या काळात कलाकारांना केलेल्या सर्व प्रकारच्या मदतीची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली .
*विजय पटवर्धन फाऊंडेशन ‘ च्या सामाजिक योगदानाविषयी :*
२०२० च्या मार्च महिन्यात कोविड नावाच्या महामारीने देशात संपुर्ण लॉकडाऊन लागू झाला आणि हातावर पोट असलेल्या अनेक कलाकार बांधवांचे हाल सुरु झाले. विजय पटवर्धन या हरहुन्नरी कलाकाराने त्याच्या परिने गरजू कलाकारांना मैत्रीचा हात देण्याचा प्रयत्न केला पण तो अपुरा होता. २०२० नोव्हेंबरमधे सर्वकाही सुरळितपणे सुरु झालं होतं. आता सर्व कलाकार खंबीरपणे आपल्या पायावर उभे रहातील असं वाटत असतानाच, पुन्हा एकदा २०२१ च्या एप्रिल महिन्यात दुसरा लॉकडाऊन लागू झाला. हे सर्व अचानक असल्यामुळे या वेळेला कोणीच काही पुर्व तयारी केली नव्हती. त्यामुळे, कलाकारांची अजूनच बिकट अवस्था झाली. अशा वेळेला विजय पटवर्धन आणि त्याच्या मित्रमंडळींनी सोशल मिडियावर आवाहन करुन रसिकांकडे कलाकारांसाठी मैत्रीचा हात मागितला. आनंदाची गोष्ट म्हणजे अनेकांनी हिरीरीने मैत्रीचा हात पुढे केला. त्यामुळे अनेक कलाकारांना शिधा वाटप करुन त्यांची निदान एका महिन्याची तरी पोट भरण्याची अडचण दूर झाली.
पण ही अडचण फक्त पुण्यातल्या कलाकारांपुरतीच मर्यादित नव्हती. तर, महाराष्ट्रातील अनेक कलाकार आपलं आणि आपल्या कुटूंबाच पोट कसं भरायचं ह्य विवंचनेत होते. म्हणूनच, “विजय पटवर्धन फाऊंडेशन’ची स्थापना करुन विजय पटवर्धन आणि त्याच्या मित्र परिवाराने पुणे, वाई, वीर, तळेगांव, कामशेत, बत्तीसशिराळा त्याचप्रमाणे मुंबई येथील कलाकारांना वेळोवेळी शिधा वाटप केले आणि निदान एक महिना तरी कलाकार आणि त्याच्या कुटूंबियांचे अन्नधान्य न मिळाल्यामुळे हाल होणार नाहित याची व्यवस्था केली. कलाकारांच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले, जेणेकरुन मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होणार नाही.. कलाकारांसाठी मोफत लसिकरणाची व्यवस्था केली. महिला कलाकारांचे कॅन्सर चेकअप केले. त्याचप्रमाणे कलाकारांना मोफत औषधोपचाराची व्यवस्थाही करुन दिली. त्यांची नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा कमीत कमी खर्चात केली जाईल याची व्यवस्था केली. या सर्व कामांकरिता समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी हात पुढे केल्याने ही कामे करणे फाऊंडेशनला सोपे गेले.
त्याचबरोबर मदत निधी गोळा करण्यासाठी फाऊंडेशनच्या वतीने नाट्यशिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यातून नवीन कलाकारांना नाट्यप्रशिक्षण तर दिले गेलेच शिवाय त्यातून जमा झालेल्या निधीमधून फाऊंडेशनला कलाकारांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करता आली.
“सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा आयोजित करुन फाऊंडेशनने नवोदित कलाकारांना एक व्यासपिठ तर उपलब्ध करुन दिलेच पण त्याचबरोबर जमा झालेल्या निधीतून कलाकारांना मदतही केली.