शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.०२ मार्च ) :- सत्ताधारी भाजपच्या मदतीने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने महानगरपालिका लुटली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने शहरातील महिलांना रोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात येते यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेची नियुक्ती केली आहे. या संस्थेने सत्ताधारी भाजप व अधिकाऱ्यांच्या संगनमताने महिलांच्या खोट्या सह्या करून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. महिलांच्या कागदपत्रांचा गैरवापर करत या संस्थेने खोट्या सह्या करून महिलांना प्रशिक्षण दिल्याचे दाखले आहेत फॉरेन्सिक अहवालांमधून या संस्थेने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाले असल्याचे आरोप नगरसेविका माया बारणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी बोलताना माया बारणे म्हणाल्या कि, नागरवस्ती विभागाच्यावतीने महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी अखिल भारतीय संस्थेची नेमणूक केली आहे. या संस्थेने महिलांना प्रशिक्षण न देता कोट्यवधी रुपयांची बिल महापालिकेकडून वसूल केले. कोरोनाच्या काळात जमावबंदी असताना तसेच रस्त्यावर चिट-पाखरू नसतानाही या संस्थेने तब्बल ६१ हजार १५५ महिलांना प्रशिक्षण दिले आहे. महापालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत सप्टेंबर महिन्यामध्ये विविध वर्तमान पत्राच्या माध्यमातून मला समजले. तेव्हा पासून या विषयांमध्ये सातत्याने अधिकारी व आयुक्तांकडे पाठपुरावा करत होते. मात्र आयुक्त व अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. महासभेमध्ये देखील हा विषय मांडला होता. त्यानंतर आयुक्तांकडे याबाबत सुनावणीची मागणी केली मात्र त्यांनी वेळ दिला नाही.
पुढे त्या म्हणाल्या की, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली त्यावर अजितदादांनी आयुक्तांना अखिल भारतीय संस्थेबाबत असलेली सर्व माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र आयुक्तांनी करारनामे देत समजून काढण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे आयुक्त माहिती देत नव्हते. यासंदर्भात आम्ही अजित पवार यांची परत भेट घेतली त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली व त्यांनी तात्काळ लगेच आयुक्तांना समज देऊन सदर माहिती लवकरात लवकर देण्याचे सांगितले. आम्हाला महापालिकेतून माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः याबाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. नागरवस्ती विभागाकडून ज्या महिलांची यादी मिळाली होती त्या महिलांचा आम्ही शोध घेतला त्यापैकी अनेक महिलांनी प्रशिक्षण घेतले नसल्याचे सांगितले, तर ज्या महिलांच्या हजेरी पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत त्यांची आम्ही फॉरेन्सिक करण्याचा निर्णय घेतला. दहा महिलांच्या स्वाक्षऱ्या आम्ही फॉरेन्सिक विभागांकडे पाठवल्या होत्या. त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्यक्ष महिलांनी केलेल्या स्वाक्षऱ्या आणि हजेरी पत्रकावर असलेला स्वाक्षऱ्या यांमध्ये तफावत आढळून आली आहे. याचाच अर्थ या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे उघड झाले असल्याची माहिती देखील माया बारणे यांनी दिली आहे.
तसेच यावेळी त्या म्हणाल्या की, ज्या वेळी आम्ही अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी या महिलांना भेटलो. त्यावेळी महिलांकडून मिळणारी उत्तरे थक्क करणारी होती. अनेक महिलांनी आमची कागदपत्रे घेऊन जातात, सह्या करून घेतात, मात्र पुन्हा आमची चौकशी करत नसल्याचा आरोप केला तर एका महिलेला हेअर स्पा कोर्स च्या नावाखाली दोन दिवस हात धुण्याचे प्रशिक्षण दिले. मात्र प्रमाणपत्र देत असताना त्यावर ९० दिवस अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण केला असल्याचे नमूद केले आहे. उच्चभ्रू घरातील महिलांना कागदोपत्री मोलकरणीचे प्रशिक्षण दिल्याचे दाखविले आहे. यावरून या संस्थेचे बनावटगिरी स्पष्ट होते. अशा प्रकारे या संस्थेने सत्ताधारी भाजप व अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. २०२०-२१ या वर्षामध्ये या संस्थेला तब्बल ५७ कोटी रुपयांचे बिल देण्यात आले आहे. मात्र या संस्थेच्या कामाचा आढावा घेतला असता संस्थेने पूर्णता बोगस काम केल्याचे समोर आले आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार असतानाही यावर सत्ताधारी भाजप मधील कोणताही पदाधिकारी बोलत नाही याचा अर्थ यामध्ये सत्ताधार्यांसह अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याचे स्पष्ट आहे. मात्र अशा प्रकारे जनतेच्या पैशाची लूट आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे जोपर्यंत या संस्थेवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे, असेही यावेळी नगरसेविका माया बारणे यांनी सांगितले.