शबनम न्युज | पुणे
पुणे जिल्हा परिषदेची स्थापना १ मे १९६२ रोजी झाली होती. या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘हिरक महोत्सव’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच यावेळी खासदार शरद पवार म्हणाले कि, मी या वास्तूमध्ये पहिल्यांदा येत आहे. माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे हे कार्यालय दुसरीकडे होते. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी अशा सर्व इमारती झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
पुढे ते म्हणाले कि, आज आपण ६० वर्षे झाली म्हणून याचा उल्लेख करतो आहोत. पंचायत राज संकल्पना या देशामध्ये फार पूर्वीपासून आहे. व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांनी देशामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे सूत्र मांडले. हळूहळू ही संकल्पना कृतीमध्ये आली व या दृष्टिकोनातून पावले टाकली गेली. ही यंत्रणा उभी राहिली ती यशवंतराव चव्हाण यांच्याकडे राज्याचे नेतृत्व आल्यानंतर. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या राज्याच्या निर्मितीनंतर १ मे १९६० पासून चव्हाण साहेबांच्या मनात सतत पंचायत राज्याची संकल्पना सत्यात आणण्याची इच्छा होती. त्याची पूर्तता १९६२ साली केली.
लोकप्रतिनिधीने जिथे नाही म्हणायचे असते तेथे नाही म्हणायची आवश्यकता असते. तरच प्रशासन खऱ्या अर्थाने पुढे जात असते, अशी महत्त्वाची शिकवण चव्हाण साहेबांनी दिली. सत्तेचे गुण-दोष आहेत. सत्ता ही मर्यादित लोकांच्या हातात असली तर सत्ता चुकीच्या रस्त्याने जाते. महात्मा गांधी ते यशवंतराव चव्हाणांपर्यंत विकेंद्रीकरणाची संकल्पना मांडली जात होती. याचे कारण सत्ता अधिक लोकांच्या हातात जाण्याची गरज आहे. त्या दृष्टीने या ठिकाणचा कायदा झालेला होता.
या सर्व व्यवस्थेमधून महाराष्ट्रात नेतृत्त्वाची फळी उभी राहिली. जिल्हा परिषद ही नेतृत्त्व उभे करण्याची जागा आहे. लोकांची कामे कशी करायची, अधिकार काय आहेत, व्यवस्था कशी करायची, या सर्व गोष्टींचे ज्ञान व अनुभव हे जिल्हा परिषदेद्वारे मिळत असे. सुरुवातीच्या काळात सभापतींकडे इतके अधिकार असायचे की विधिमंडळातील आमदारांमध्ये अस्वस्थता असायची. असे ही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.