शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
“जनजाती समाजाचे हिंदू संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान आहे!” असे गौरवोद्गार वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय अध्यक्ष रामचंद्र खराडी यांनी माले, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे रविवार, दिनांक २२ मे २०२२ रोजी काढले. महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रमाच्या माले येथील समाज कल्याण केंद्राच्या नूतन वास्तूचे उद्घाटन रामचंद्र खराडी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, माले गावाच्या सरपंच सोनाली शेंडे, कल्याण आश्रमाचे मुळशी तालुका अध्यक्ष वसंत वाघमारे, सचिव सागर काटकर, महाराष्ट्र कल्याण आश्रम (पिंपरी-चिंचवड शाखा) पदाधिकारी, रोहन बिल्डर्सचे पदाधिकारी, आश्रमाचे देणगीदार, माले ग्रामस्थ आणि कातकरी बंधूभगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम ही संस्था महाराष्ट्रातील जनजाती समाजाच्या पुनरुत्थानासाठी विविध सेवाकार्य करीत आहे.
मुळशी तालुक्यात मोठ्या संख्येने कातकरी समाज राहतो. त्यामुळे २०१६ साली महाराष्ट्र कल्याण आश्रम पिंपरी-चिंचवड शाखेच्या तत्कालीन अध्यक्ष अंजली घारपुरे यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रीय सर्वांगीण विकास संस्थेच्या सहकार्याने माले येथे भाड्याच्या जागेत एक वसतिगृह सुरू करण्यात आले. पुण्यातील रोहन बिल्डर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या मदतीने दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रमाच्या समाज कल्याण केंद्राची स्वतःची वास्तू उभी राहिली. या प्रसंगी डॉ. प्रवीण दबडघाव यांनी, “कल्याण आश्रम ही एकमेव संस्था जनजाती समाजाच्या संस्कृतीवरील आक्रमण, जबरदस्तीने धर्मांतर या विषयावर तळमळीने काम करते!” अशी माहिती दिली.
“या वास्तूमुळे माले गावाच्या वैभवात भर पडली आहे!” अशा भावना सुहास शेंडे आणि अन्य ग्रामस्थांनी व्यक्त करून आपल्या पाल्यांना वसतिगृहात पाठविण्याविषयी उत्सुकता दर्शवली. त्यानंतर पालघर तालुका, कुलाबा जिल्हा आणि मुळशी तालुक्यातील जनजाती कलावंतांनी अनुक्रमे तारपा नृत्य, भजने आणि पोवाड्यांचे सादरीकरण केले. महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम (पिंपरी-चिंचवड शाखा) सचिव विजय भालिंगे आणि सहसचिव नारायण ठिकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अंजली चिंचोलकर यांनी आभार मानले. गायिका शर्मिला शिंदे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.