शबनम न्युज | मुंबई
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. याचबरोबर, संपकरी आंदोलकांना प्रोत्साहन देणाऱ्यांना व विरोधकांवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. “कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका”, असं मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी आंदोलकांना आवाहन करताना म्हंटले कि, “एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्यशासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले, असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी #एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन pic.twitter.com/6XffAqLWn5
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 10, 2021
तसेच, “अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही करोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे.” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.