शबनम न्युज | मुंबई
देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात नेहमीप्रमाणे जोशपूर्ण दिसलं नाही, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आजच्या विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनात लगावला आहे. तसेच एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत हे वारंवार का सांगावं लागत आहे? असा प्रश्न ही पवारांनी उपस्थित केला. आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज विश्वासदर्शक ठराव विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले यात शिंदे-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी सांगोल्याचे आमदार शहाजी बापू च्या ‘त्या’ उच्चाराचा ही समाचार घेतला. ते म्हणाले कि, अनेकांना इथनं सुरतला जायला मिळालं, सुरत नंतर गुवाहाटीला मग गोव्याला जायला मिळालं, आणि त्यामध्ये आमचे शहाजी बापू…’काय ते झाडी, काय ते डोंगर, काय ते हॉटेल, ओके मध्ये हाय..’ असे बापू यांचे उच्चार. बापू आपण एकत्र निवडून आलो, आपण एकत्र काम केलं, यामध्ये गोंधळून जायचं काही काम नाही, वक्तव्य करण्याचं काही कारण नाही, हे मोठे लोक कधी एकत्र येतील कळणार पण नाही, असा टोला पवारांनी शहाजी बापूला लगावला.
ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी बारकाईने ऐकलं. तुम्ही एकनाथ शिंदेंचं इतकं समर्थन करत होता. मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रीमंडळात होते, तेव्हा फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिलं. नेता मोठा असेल तर खाती जास्त असतात. चंद्रकांत पाटील यांना ते माहिती आहे. ज्याचं वजन असतं, भारदस्त असतो त्याच्याकडे अधिक खाती असतात. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अनेक खाती होती.” असा टोला पवारांनी लगावला आहे.
अजित पवार म्हणाले, “मला एकनाथ शिंदे यांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. भाजपाची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून भाजपाने शिवसेनेच्या मदतीने टप्प्याटप्प्याने पक्ष वाढवत नेला. १९८० ला भाजपाचे १४ आमदार होते. १९८५ ला १६ झाले, १९९० ला १६ वरून ४२ झाले. १९९५ ला ६६ झाले, १९९९ ला परत ५६ झाले, २००४ ला ५४, २००९ ला ४६, २०१४ ला भाजपाचे १२२ आमदार आले. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळे लढले. २०१९ मध्ये आता १०५ आमदार निवडून आले.”
भाजपाने शिवसेनेसोबत राहून त्यांची ताकद वाढवली. प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम करत असतो. आघाडी असली तरी एकनाथ शिंदे त्यांच्या गटाची ताकद वाढवण्यावर भर देतील, फडणवीस त्यांचा पक्ष वाढवण्यावर भर देतील,” असं अजित पवार म्हणाले.