शबनम न्युज | मुंबई
महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला हे खरं आहे. सत्तेत आल्यानंतर आम्ही अडीच वर्ष केलेल्या कामाचा मी उल्लेख करणार आहे असं बाळासाहेबांनी सांगताच सुधीर मुनगंटीवार यांनी व्यत्यय आणला. यावर थोरात यांनी अध्यक्षांकडे तक्रार केली आणि शिस्त पाळली जावी असं सांगितलं. आज विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज विश्वासदर्शक ठराव विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मांडण्यात आले यात शिंदे-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यावेळी थोरात बोलत होते.
ते म्हणाले कि, सूरत, गुवाहाटी कुठे फिरलात यामध्ये मी जात नाही. सगळं होत असताना बंदूक आमच्या खांद्यावर ठेवली याचं वाईट वाटतं अशी खंत थोरात यांनी व्यक्त केली. सरकार कसं आलं हे सर्वांना माहिती आहे. सत्तेत आल्यानंतर तुम्ही लगेच आरे मेट्रो कारशेडचा निर्णय लगेच घेतला. त्यावर आंदोलन सुरु असून त्याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. तुम्ही गुवाहाटीत होता त्यामुळे माहिती नाही पण इथे दुष्काळ पडला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही पाऊसच नाही ही अवस्था राज्याची आहे, दुबार पेरणीची वेळ आली आहे त्यावर चर्चा करायला हवी होती. पण सत्तेच्या खेळात दुर्लक्ष झालं आहे अशी टीका थोरात यांनी केली.
करोनाचं संकट आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत होतो. कोरोनामध्ये दोन वर्ष गेली हे लक्षात घेतलं पाहिजे. पाच वर्षाचाच सरकारचा कार्यकाळ असतो. मुंबई कशी सांभाळली याचं जागतिक पातळीवर कौतुक झालं. राज्यालाही आम्ही करोना संकटात योग्य सांभाळलं. सामान्य माणूस हे कधीच नाकारणार नाही. मुख्यमंत्र्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांनी चांगलं उदाहरण घालून दिलं असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
कोरोनामुळे आर्थिक निधी उपलब्ध होत नसताना एकीकडे जनतेला मदत करत होतो आणि महत्वाची कामंही सुरु होती. कोस्टल रोड, मेट्रो, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई विमानतळच्या कामात कुठेही कमी पडलो नाही असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. एक पक्षाचं सरकार असलं तरी कुरघोडी, दबाव, समस्या असतात. महाविकास आघाडीत आम्ही संयमाने भूमिका घेत होतो, असंही ते म्हणाले.