शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्रात उद्भवलेल्या राजकीय पेचप्रसंगाबाबत सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर आज सुनावणी झाली. ही सुनावणी आता १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या विषयासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केले. गटनेता कुणी बदलायचा? पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होतो का? अशा अनेक बाबींची पडताळणी व्हायची बाकी आहे. एकूणच राज्यात ‘कानुनी लोचा’ निर्माण झाल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूच्या लोकांना २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करुन आपापली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात आता आणखी मोठे घटनापीठ होणार आहे की तेच घटनापीठ निकाल देणार हे आता पुढे कळेल, असेही ते म्हणाले. तसेच दोन्ही बाजूच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाची माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या प्रकरणातून संपूर्ण देशाला आणि सर्वच राज्यांना मार्गदर्शक ठरेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाला द्यावा लागणार असल्याचेही भुजबळ म्हणाले.