पत्रकार परिषद घेत अजित पवार विरोधकांवर संतापले
शबनम न्युज | पुणे
“मला भाजपाने विरोधीपक्षनेते पद दिलेलं नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे ५३ आमदार आहेत, त्यांनी ते विरोधीपक्षनेते पद मला दिलेलं आहे. त्यामुळे त्या पदावर मला ठेवायचं नाही ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे. बाकीच्यांना त्यामध्ये मागणी करण्याचा काहीच अधिकार नाही.” असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हंटले आहे. पवारांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा शिंदे-भाजप गटाकडून निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच राज्यात अजित पवारांविरोधात आंदोलन ही केले जात आहे. दरम्यान, आज अजित पवार यांनी पुण्यात विधानभवनात पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले, “मी आजपर्यंत कुठल्याही महापुरुषांबद्दल, महिलांबाबत कधीही चुकीचं बोललेलो नाही. मात्र या अगोदर जो महाविकास आघाडीचा महामोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी राज्यपालांनी अक्षरशा राष्ट्रपुरुषांचा अपमान केलेला होता. वेगळ्याप्रकारची वाक्यरचना केली होती, बेताल वक्तव्य केलं होतं. जो शब्दप्रयोग करायला नको होता, तो त्यांनी केला होता. ते सर्व मी त्यावेळी समोर मांडलं होतं. मला एक कळत नाही, आता हे मागील दोन दिवस भाजपा त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले, की तुम्ही अजित पवारांच्याविरोधात आंदोलन करा आणि अजित पवारांचा राजीनामा मागा. मला भाजपाने विरोधीपक्षनेते पद दिलेलं नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे ५३ आमदार आहेत, त्यांनी ते विरोधीपक्षनेते पद मला दिलेलं आहे. त्यामुळे त्या पदावर मला ठेवायचं नाही ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे. बाकीच्यांना त्यामध्ये मागणी करण्याचा काहीच अधिकार नाही.”
तसेच यावेळी बोलतांना अजित पवारांनी आंदोलन करणाऱ्यांवर टीका देखील केली. ते म्हणाले, “मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, की मंत्री, आमदार, खासदारांनी आणि काही कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलं की, हे आम्हाला आंदोलन करायला सांगत आहेत आणि अजित पवार चुकीचं बोललं असं सांगत आहेत. मात्र आम्हालाही कळेना तुम्ही नेमकं काय चुकीचं बोलले आहात. परंतु आम्हाला आंदोलनचा काय पॅटर्न असला पाहिजे, अजित पवारांच्या फोटोला फुली आणि उर्वरीत मायना असं सगळं पाठवून दिलेलं आहे. आम्हाला सांगितलं आहे की, जिथे तुम्ही आंदोलन कराल त्याचा फोटो काढायचा आणि तो भाजपा कार्यालयास पाठवायचा. अशा पद्धतीने ते आंदोलन करायचं असं सांगितलं गेलं.”