शबनम न्युज / मुंबई
राज्यातील कोरोना लसीकरण मोहिमेत लशींच्या तुटवड्यामुळे खंड पडत आहे. त्यामुळे १८-४४ वयोगटातील लसीकरणाला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली. देशात कोरोना लस ही मुख्यत्वे दोन कंपन्यांकडून मिळत आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील लोकांसाठी लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र लसीचा दुसरा डोस देण्यास केंद्र सरकार असमर्थ ठरत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून येणाऱ्या लशींच्या प्रतीक्षेत न राहता ४५ वर्षांवरील लोकांना दुसरा डोस देण्याकरता महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेल्या लशी ४५ वर्षांवरील लोकांना देण्यात येतील, असे राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
राज्य सरकारने ४५ वर्षांवरील लोकांना तातडीने दुसरा डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात ४५ वर्षांवरील लोकांचे २० लाख डोस देणे बाकी आहे. यात शासनाकडून १० लाख लशींचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांतच हे डोस दिले जातील. त्यासोबतच केंद्र सरकारकडून येणारा लशींचा साठाही राज्य सरकार दुसऱ्या डोससाठीच वापरणार असल्याचे टोपे म्हणाले.