शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पुणे – आळंदी रस्ता रुंदीकरण झाल्यामुळे दिघी – बोपखेल परिसरात मागील दहा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या परिसरातील लोकसंख्या सत्तर हजारांहून जास्त आहे. दिघी गावचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश 1997 ला झाला. यावेळी झालेल्या डीपी प्लॅनमध्ये 37 आरक्षणे जाहिर करण्यात आली. परंतू यामधील शाळेची इमारत वगळता एकही आरक्षण अद्यापपर्यंत विकसित करण्यात आले नाही. या परिसरातील लोकसंख्या विचारात घेता नागरीकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन दिघी येथील (आरक्षण क्र. 2/145 सर्वे नं.05) अग्निशमन केंद्राचे आरक्षण आणि दिघी येथिल (आरक्षण क्र. 2/119 गट नं. 82,83) येथिल राज्यस्तरीय क्रीडांगणाचे आरक्षण प्राधान्यक्रमाने विकसित करावे अशी मागणी दिघी शिवसेना माजी विभाग प्रमुख संतोष तानाजी वाळके यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.
1997 पुर्वी ग्रामपंचायतीने बांधलेली स्मशानभूमी आणि नंतर महानगरपालिकेने बांधलेली शाळेची इमारत एवढ्या दोन वास्तू सार्वजनिक सुविधासाठी नागरीकांना उपलब्ध आहेत. दिघी – बोपखेल परिसरात एखादी आग लागण्याची दुर्घटना घडल्यास येथिल नागरीकांना भोसरीतील अग्निशमन केंद्रावर अवलंबून रहावे लागते. या परिसरात गरज असतानाही अद्यापही महानगरपालिकेचे रुग्णालय, उद्यान, व्यायामशाळा, ज्येष्ठ नागरीकांसाठी विरंगुळा केंद्र, सार्वजनिक मंडई, सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालय विकसित करण्यात आले नाही. या परिसरातील हजारो नागरीकांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या भागातील लोकप्रतिनिधी नागरीकांना सार्वजनिक सेवासुविधा देण्यासाठी अपयशी ठरले असून आता आयुक्तांनीच पुढाकार घ्यावा अशी मागणी दिघी शिवसेना माजी विभाग प्रमुख संतोष तानाजी वाळके यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी पत्राव्दारे केली आहे.