शबनम न्यूज | नवी मुंबई
प्रतिनिधी | मुंबई
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. राज्य सरकार याविषयी अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
राज्यात काही भागात रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे केरळ राज्यात ओणम सणानंतर रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसली. त्याचप्रमाणे आपल्याकडे गणेशोत्सवानिमित्त मोठी गर्दी होताना दिसत आहे. यातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टास्क फोर्स व केंद्राच्या म्हणण्यानुसार नियमावलीत बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे अजित पवार म्हणाले. राज्यात रुग्णसंख्या वाढली तर राज्य सरकारला दोष दिला जाईल, असे होऊ नये यासाठी राज्यातील मोठ्या गणपती मंडळांनी साधेपणाने सण साजरा करावा तसेच घरात गणपती सण साजरा करताना योग्य ती सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.