शबनम न्युज | मुंबई
मुंबई | प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची राजकीयदृष्ट्या अवस्था अलीकडच्या काळात ‘सांगता येत नाही, सहन होत नाही’ अशी झाली आहे. त्यामुळे वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांबाबत वक्तव्य केले. पण त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. त्यांचे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. सुनील तटकरे यांनी केली आहे. श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेबांवर टीका केली होती. त्या टीकेला आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
खासदार शरद पवार हे देशाचे नेते व आघाडीचे जनक आहेत. त्यांचे मार्गदर्शन व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अत्यंत सक्षमपणे राज्याचा कारभार चालवला जात आहे. कोविड महामारीचा मुकाबला महाराष्ट्र ज्या पद्धतीने उद्धवजींच्या नेतृत्त्वाखाली करतो आहे त्याची प्रशंसा होत असताना कदाचित अडगळीत पडलेल्या नेत्यांना या साऱ्या गोष्टींचे भान राहिले नसेल. म्हणून नैराश्यापोटी गीते यांनी अशी वक्तव्ये केली, असा टोला खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिद्धांतावर, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर आणि पवार साहेबांच्या धर्मनिरपेक्ष विचारांवर ठाम विश्वास असणारा पक्ष आहे. देशाच्या राष्ट्रीय घडामोडींमध्ये पवार साहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक अढळ स्थान आहे. हे स्थान कोणा एका व्यक्तीच्या बोलण्यामुळे कमी होणार नाही.तसेच महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. आगामी काळातही हे सरकार महाराष्ट्रात निश्चित राहील याबाबत संदेह वा शंका नाही. भक्कम विचारांनी स्थापन झालेले हे सरकार महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी निश्चितपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजितदादा पवार व बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करेल, असा ठाम विश्वास तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे उपस्थित होते.