शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
इंदौरच्या धरतीवर पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग १७ कचराकुंडी मुक्त करण्यासाठी नागरिकांनी अग्रेसर भुमिका घेतली असून हा प्रभाग कचरा कुंडी मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु असल्याची माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. मागील काही दिवसापुर्वी महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकारी यांनी इंदौर येथे कचरा स्वच्छतेच्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या अभियानाची पाहणी करण्यासाठी दौरा केला होता. त्याचप्रमाणे कालपासुनच शहरामध्ये ‘स्वच्छाग्रह’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कालपासुनच शहरामध्ये ‘स्वच्छाग्रह’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असल्याचेही श्री. ढाके यांनी सांगितले.
ब प्रभाग क्षेत्रिय अधिकारी सोनम देशमुख, सहाय्यक आरोग्य अधिकारी महादेव शिंदे, आरोग्य निरीक्षक भुषण शिंदे, स्वच्छता कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले आहे. या प्रभागाचे नगरसेवक म्हणून सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक सचिन चिंचवडे, नगरसेविका करुणा चिंचवडे व नगरसेविका माधुरी कुलकर्णी यांनी सुरु केलेल्या जनजागृती माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेच्या दृष्टीने अग्रेसर उपाययोजना राबविल्या जात आहेत.
या अभियानात प्रामुख्याने संपुर्ण शहर टप्याटप्याने १०० % कचराकुंडी मुक्त करुन घरातुनच कचऱ्याचे विलगीकरण करुन कचरा संकलन करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. इंदोर येथील सुरु असलेल्या स्वच्छता अभियानानुसार पिंपरी चिंचवड शहरातील प्रायोगिक तत्वावर प्रथम चार प्रभाग कचराकुंडी विरहीत करण्याचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रभाग क्रमांक १७ वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, गिरीराज, दळवीनगर, प्रेमलोक पार्क हा परिसर कचराकुंडी मुक्त करण्यासाठी प्रभागातील आम्ही सर्व नगरसेवकांनी विशेष पुढाकार घेतला आहे. या परिसरातील सर्व कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत. यापुर्वी परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला कचराकुंड्या असताना या भागातील नागरिक अत्यंत अस्ताव्यस्तपणे आपल्या घरातील कचरा या कचराकुंड्यामध्ये व आजुबाजुला अक्षरश: फेकुन देत होते. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरत होते. प्रथमत: कचराकुंड्या काढल्यानंतर परिसरातील नागरिकांनी ओरड सुरु केली होती. परंतु घरातील व व्यावसायांकडील कचरा संकलन करण्यासाठी जाणारी वाहने वेळेत व मुबलक प्रमाणात वाढविण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मक असा बदल होत असून प्रभाग कचराकुंडी मुक्त करण्यासाठी नागरिकांचे सकारात्मक सहकार्य लाभत आहे. पुर्वी ज्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याकामी प्रभावी जनजागृतीद्वारे नागरिकांमध्ये निश्चितपणे सकारात्मक बदल घडवून आणणे व प्रभाग कचराकुंडी मुक्त करणे सहज साध्य होणे शक्य आहे, असेही सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.