शबनम न्युज | मुंबई
देशाचा स्वातंत्र्य लढा हा दिडशे वर्षांहून अधिक काळ सुरू होता. या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसेनानीं बलिदान दिले आहे. मात्र अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या वक्तव्यातून सर्व स्वातंत्र्यसेनांचा अपमान केलाय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
स्वातंत्र्यलढ्याचा एवढा मोठा इतिहास असताना हे स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले आहे, असे बोलणाऱ्या कंगनाचा नवाब मलिक यांनी निषेध व्यक्त केला. इंग्रजांचे समर्थन करणाऱ्या लोकांकडून पद्मश्री दिलेल्यांना अशाप्रकारची वक्तव्ये करण्यासाठी पुढे केले जात आहे. कंगनाला ‘मलाणा’ क्रिमचा डोस जास्त झाला असावा त्यामुळे अशाप्रकारचे वक्तव्य तिने केले असावे, अशी निंदा त्यांनी केली.
केंद्र सरकारने तातडीने कंगना रनौतचा पद्मश्री परत घ्यावा, तसेच स्वातंत्र्य सैनिकांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत तिला अटक करुन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.