शबनम न्यूज : मुंबई (दि.२६ नोव्हेंबर ) :- भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश कार्यालयात पक्षाच्या मुंबई सामाजिक न्याय विभागाच्यावतीने संविधान गौरव दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात खा. सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी खा. सुप्रियाताई सुळे आपल्या भाषणात म्हणाल्या कि, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी हे संविधान आपल्या भारतीयांना सुपूर्द केलं त्यामुळेच आज ज्या संसदेत मी आपलं प्रतिनिधित्व करते तिचं पावित्र्य टिकून आहे. या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ज्या संविधानाने ताकद दिली त्या संविधानाचा सन्मान आपल्याला टिकवायचा आहे. या संविधानाने ही ताकद आपल्याला दिली म्हणूनच संयुक्त किसान मोर्चातल्या शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले.’
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि पवारसाहेबांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची वाटचाल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या मार्गदर्शनाने केली. त्यामुळेच पवारसाहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्द्यावर अढळ राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ग्लोबल म्हणजे जागतिक दर्जाचं आहे. म्हणूनच संपूर्ण जग डॉ. बाबासाहेबांसमोर नतमस्तक होतं, असे मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
संविधान हे जात नाही किंवा धर्म नाही किंवा प्रांत नाही. तो एक ग्रंथरूपातला कष्टपूर्वक घडवलेला मार्गदर्शक आहे. पण आता केंद्रातले सत्ताधारी हे संविधान बदलू पाहात आहेत. त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न याच दिशेने सुरू आहेत.मी आमच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजियाताईंचा आवर्जून उल्लेख करेन. त्यांनी संविधान बदलाच्या विरोधात नारा दिला. आज आपली जी काही ओळख आहे ती संविधानामुळे आहे. त्यामुळे संविधानात जर कुणी बदल करत असेल तर त्याचा कडाडून विरोध आपल्याला करायला हवा. संविधान वाचलं तरच देश वाचेल. त्यामुळे आपण संपूर्ण राज्यभर संविधानाच्या संरक्षणासाठी उभं राहिलं पाहिजे, असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सुनिल शिंदे, मुंबई विभागीय महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवती अध्यक्षा अदिती नलावडे आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.