शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०१ डिसेंबर) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाळगाव चिखली या ठिकाणी कार्तिक एकादशी चे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिका संगीत अकादमीच्या संयुक्त विद्यमाने भक्तिरस हा कार्यक्रम आयोजित केला गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजाचे अकरावे वंशज ह भ प पुंडलिक महाराज देहूकर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहू व विश्वस्त प्रमुख ह भ प विशाल महाराज मोरे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्था पावनधाम बीड, संस्थापक ह-भ-प महादेव महाराज बोराडे शास्त्री, प्रमुख पाहुणे म्हणून तसेच संतपीठाचे संचालक ह-भ-प राजू महाराज ढोल व संचालिका स्वाती मुळे, व संतपीठाचे अभ्यासक प्राचार्य ज्ञानेश्वर घाडगे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संतपीठाच्या उभारणीमध्ये संत महंतांनी कायमस्वरूपी मार्गदर्शन करावे, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असावा, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच सीबीएससी शिक्षणाबरोबर मराठी साहित्य व सांस्कृतीचे एक आगळेवेगळे शिक्षण देण्यासाठी संत पीठाची निर्मिती टाळगाव चिखली या ठिकाणी होत आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक, महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सादरीकरणामध्ये संतपीठाचे संचालक राजू महाराज ढोरे, श्रीरामाचा तेरा अक्षरी मंत्र तसेच रूप पाहता लोचनी या अभंग रचना ने सुरुवात केली. त्यानंतर मूर्ती पूजन, मान्यवरांचे सत्कार व कार्यक्रमास सुरुवात झाली. त्याचबरोबर गायत्री ताई थोरबोले यांनी संदर ते ध्यान, विठ्ठल रखुमाई हे अभंग सादर केले. स्नेहल पगार यांनी ओव्या गाऊनी सुरात हे गीत सादर केले. नेहा नाफडे यांनी कानडा राजा-पंढरीचा व आळंदी हे गाव हे अभंग सादर केले. वैजंती भालेराव यांनी खेळ मांडीयेला, वाळवंटी घाई व दिंडी चालली चालली हे अभंग सादर केले. स्मिता देशमुख यांनी सर्व सुखाची लहरी हा अभंग सादर केला. नंदिन सरीन यांनी ओम नमो ज्ञानेश्वरा व सावळे मनोहर रूप अति देखणे हे अभंग सादर केले, सुभाष शिंदे यांनी आनंदाचे डोही, आनंद तरंग व अरे अरे ज्ञाना झालासी पावन हे अभंग सादर केले. गायत्री ताई थोरबोले यांनी एकच टाळी झाली हा अभंग व गिरिधर का रुसला हे गौळण सादर केले. राजू महाराज ढोरे यांनी अकल्प आयुष्य तया अभंग व गड्यांनो राधा की रे झाला ही गौळण सादर केली . दलाल सर यांनी रंग आणा हो रंगनी व मिळे आवडीचे सुख हे अभंग सादर केले.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी तबलासाथ विनोद सुतार, संतोष साळवी व समीर सूर्यवंशी, मृदंग साथ तुकाराम ढोरे, करताल साथ हरिभाऊ असत्कर, हार्मोनियम साथ दलाल सर, उमेशजी पुरोहित, नेहा नाफडे यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे सर्व संचालक ,आयोजक, शिक्षक-शिक्षकेतर इतर कर्मचारी यांनी केले.
कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन संत पिठाच्या संचालिका स्वाती मुळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतपीठाचे संचालक ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतपीठाचे अभ्यासक प्राचार्य ज्ञानेश्वर घाडगे यांनी केले.