शबनम न्यूज : मुंबई (दि.१४ डिसेंबर ) :- कोरोना काळातील कामावरून मुंबई उच्च न्यायालयाकडून ठाकरे सरकारचे कौतुक करण्यात आले आहे. कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत जनहित याचिका काही जणांनी दाखल केली होती, या जनहित याचिका निकालात काढत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कामकाजाचे कौतुक केले.
न्यायालयाकडून ठाकरे सरकार बद्दल सांगण्यात आले आहे कि, महाराष्ट्र कोविड 19 चा मुकाबला करण्यात देशात अग्रस्थानी राहीलाय. यासंदरर्भात साल 2020-21 मध्ये भेडसावणा-या समस्या आता उरलेल्या नाहीत. त्यामुळे “आपण ते वाईट दिवस आता विसरायला हवेत” असं मत व्यक्त करत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठानं कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत दाखल जनहित याचिका निकाली काढल्या. मुंबईसह राज्यातील रूग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा, लसीकरणातील समस्या, जेष्ठ नागरीकांना भेडसावणा-या समस्या यासारख्या समस्यांवर बोट ठेवत स्नेहा मरजादी यांच्यासह अन्य काहीजणांनी मुंबई उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल केल्या होत्या.