शबनम न्यूज ; पिंपरी चिंचवड (दि.२१ डिसेंबर) :- माननिय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण स्थगित झाले आहे. याला सर्वस्वी केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे. हे आरक्षण पुर्ववत मिळावेत यासाठी देशभरातून ओबीसींचा दबाव या सरकारवर निर्माण झाला पाहिजे. यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 23 डिसेंबर) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये राज्यभरातील ओबीसी बंधू भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी केले.
मंगळवारी (दि. 21 डिसेंबर) पिंपरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तायडे बोलत होते. यावेळी महिला शहराध्यक्षा लता रोकडे, ज्येष्ठ ओबीसी नेते प्रताप गुरव, शहर महासचिव राजन नायर, माजी नगरसेवक अंकुश कानडी आणि शहर युवक अध्यक्ष चंद्रकांत लोंढे, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आनंदा कुदळे, प्रवक्ता के. डी. वाघमारे, युवा महासचिव कमलेश वाळके, असंघटीत नेते गुलाब पानपाटील, उपाध्यक्ष भारत कुंभारे, कचरु ओव्हाळ, कोषाध्यक्ष शारदा बनसोडे आदी उपस्थित होते.
यावेळी तायडे यांनी सांगितले की, मा. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा सादर करण्यास मुदतवाढ द्यावी. तसेच राज्य सरकारने आगामी हिवाळी अधिवेशनात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा करण्याचा ठराव संमत करावा आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित राहण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवावी. मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसींचा इम्पेरीकल डेटा सादर करण्यास असमर्थ ठरलेले राज्यातील महाविकास आघाडी सरकार व तो डेटा देण्यास नकार देणारे केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार हे दोघेही जाणीवपूर्वक ओबीसींची दिशाभूल करीत आहेत. भाजप, सेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या चारही प्रस्थापित पक्षातील श्रीमंत मराठा हा गरीब मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याची राजकीय खेळी करीत आहे. केंद्र व राज्यसरकार मधील या प्रस्थापित पक्षांना ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणावयाचे आहे. यांना ओबीसींना राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवून त्यांच्या हिश्शाची सत्ता उपभोगायची आहे. आरक्षणाच्या माध्यमातून जर इथला ओबीसी समाज आपल्या हक्क व अधिकारांप्रती जागृत झाला तर या प्रस्थापित पक्षांना त्यांची सत्तेची दुकाने बंद होण्याची भीती आहे आणि याच भीतीपोटी ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न हे प्रस्थापित पक्ष मिळून करीत आहेत. वंचित बहुजन आघाडी याचा तीव्र निषेध करीत आहे. 6 डिसेंबर रोजी राज्यशासनाने काढलेला ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश मा. सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. हा अध्यादेश न्यायालयात टिकणार नाही अशी टीका देखील वंचित बहुजन आघाडीने केली होती. परंतु केवळ ओबीसींची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्यसरकार जाणीवपुर्वक अशी भुमिका घेत आहेत हे आत्ता ओबीसी समाजाने लक्षात घ्यायला हवे. केंद्र व राज्य सरकारच्या याच राजकीय षडयंत्रामुळे राज्यात 105 नगरपंचायत निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण स्थगित केले आहे. दुसऱ्या टप्प्यात या जागांवर खुल्या प्रवर्गातील निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने घेतला आहे. आगामी येऊ घातलेल्या राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये देखील ओबीसी आरक्षण स्थगित होण्याची भीती आहे. आता ओबीसी समाजाने आता प्रस्थापित पक्षांच्या विरुध्द ओबीसी समाज म्हणुन एकत्र येऊन एक नवा राजकीय पर्याय उभा करण्याची गरज आहे. तरच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम राहील अन्यथा राजकीय आरक्षणा पाठोपाठ ओबीसी समाजाचे शैक्षणिक व नोकऱ्यांमधील आरक्षण देखील संपुष्टात आणण्यासाठी हे प्रस्थापित पक्ष प्रयत्न करतील अशी भीती आहे असे देवेंद्र तायडे म्हणाले.
शनिवारी (दि. 25 डिसेंबर) भारतीय स्त्री मुक्ती दिनानिमित्त “स्त्री मुक्ती परिषदेचे” आयोजन पिंपरी चिंचवडमध्ये करण्यात आले आहे. तसेच 25 डिसेंबर हा दिवस “मनुस्मृती दहन दिवस” 1997 पासून पूर्वी भारिप बहुजन महासंघ व तदनंतर वंचित बहुजन आघाडी “भारतीय स्त्री मुक्ती दिन” म्हणून साजरा करीत आहे. तसेच या परिषदेत मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक असणारे “पैगंबर मोहम्मद बिल” तात्काळ लागू करावे. राज्य शासनाने महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा , तालुका, शहर गावपातळीवर “जिजाऊ पथक” व “अहिल्या पथक” निर्माण करावे हे ठराव मांडण्यात येणार आहे. या परिषेदेत शहरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन महिला आघडीच्या शहराध्यक्षा लता रोकडे यांनी केले.
“वंचित बहुजन युवा आघाडी” च्या शहराध्यक्षपदी चंद्रकांत लोंढे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यानिमित्त देवेंद्र तायडे यांच्या हस्ते लोंढे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी-चिंचवड शहराची नवनियुक्त कार्यकारणी खालील प्रमाणे अध्यक्ष: चंद्रकांत लोंढे ; महासचिव: कमलेश वाळके ; उपाध्यक्ष: सुनील जावळे, राहुल बनसोडे ; सचिव: अमित सूर्यवंशी, अतुल सोनवणे, गणेश अडसूळ ; संघटक:समाधान देवकुळे, इस्माईल नदाफ, नारायण गजरे, ब्रह्मदेव तरांगे ; प्रसिद्धिप्रमुख: दीप्ती नितनवरे ; सदस्य: तृप्ती नखाते, सोनाली आठवले, स्वप्नील गायकवाड, प्रमोद शिंदे, मिलिंद कांबळे, वामन कांबळे, उमेश बनसोडे आदी.