शबनम न्युज : पिंपरी चिंचवड (दि.३१ डिसेंबर) :- क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटिझन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय प्राचीन भारतीय संस्कृती व्याख्यानमाला आणि भारतीय वारसा परिचय कार्यशाळा अंतर्गत गुरुवार, दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ०७:३० वाजता चिंचवड हेरिटेज वॉक हा उपक्रम राबविण्यात आला. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथून पेशवेकालीन मंगलमूर्ती वाडा, ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, क्रांतितीर्थ चापेकर वाडा, सुमारे तीनशे बासष्ट वर्षे जुने असलेले मोरया गोसावी मंदिर आणि धनेश्वर हे प्राचीन शिवमंदिर या स्थळांविषयी पद्मश्री गिरीश प्रभुणे, श्रीकांत चौगुले, किरण कलमदाणी आणि अंजली कलमदाणी यांनी नागरिकांना दुर्मीळ ऐतिहासिक माहिती दिली.
‘वारसा’ व्याख्यानमालेत ‘वारसा जनजागृती’ या विषयावर रमेश पडवळ यांनी पूर्वकालीन ‘गोवर्धन’ अर्थातच नाशिक या शहराचा आणि परिसराचा सुमारे साठ हजार वर्षे प्राचीन असलेला इतिहास रंजक शैलीतून कथन केला.
‘लिखित वारसा : जतन संवर्धन’ या विषयावर डॉ. श्रीनंद बापट यांनी अतिप्राचीन शिल्प, शिलालेख, ताम्रपट, भुर्जपत्र, दुर्मीळ पोथ्या आणि पत्रे यांविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले.
‘लोकसहभागातून वारसा संवर्धन’ या विषयावर मयूरेश प्रभुणे यांनी नागरिकांच्या पुढाकाराने आणि सहभागातून राबविण्यात आलेल्या गंगा नदीतील सूक्ष्मजीवांचा अभ्यास, ग्रहणातील प्रथांची वैज्ञानिक कसोटीवर पडताळणी, आणि ‘प्रोजेक्ट मेघदूत’ प्रकल्पातून भारतीय मॉन्सूनचा अभ्यास या संदर्भात उपयुक्त माहिती दिली.
‘वारसा : कौशल्ये’ या विषयावर गिरीश प्रभुणे यांनी बेलदार, पाथरवट, वडार अशा भारतीय जनजातींच्या पारंपरिक अन् मौखिक ज्ञान आणि कौशल्यांचा सोदाहरण ऊहापोह केला. याप्रसंगी अनुक्रमे संजय कुलकर्णी, ॲड. सतीश गोरडे, प्राचार्य मनोज देवळेकर, डॉ. श्रीपाद ढेकणे, वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानमाला आणि कार्यशाळेचा समारोप डॉ. वसंत शिंदे यांच्या ‘राखीगढी संशोधन – भाग २’ या विषयावरील व्याख्यानाने करण्यात आला. डॉ. वसंत शिंदे म्हणाले की, इसवी सन पूर्व वीस लाख वर्षांपूर्वी भारतीय समाज भटक्या स्वरूपात अस्तित्वात होता. राखीगढ येथे केलेल्या पुरातत्त्व उत्खननातून जगात सुमारे साडेसात हजार वर्षांपूर्वीपासून भारतीयांनी सुरू केलेला स्थिर जीवनाचा प्रारंभ हा सर्वात प्राचीन असल्याचे आढळून आले आहे. २०१९ साली चीन येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राखीगढी संशोधन शोधनिबंधाला वैज्ञानिकांनी मान्यता दिली आहे. अतिशय मुद्देसूद आणि सचित्र सादरीकरणाने दिलेल्या या व्याख्यानाला श्रोत्यांनी उभे राहून मानवंदना दिली.
ज्ञानेश्वर सावंत, डॉ. रमेश पांडव, दिलीप केळकर यांनी कार्यशाळेविषयी मनोगते मांडली; तर प्रशांत पाटील आणि डॉ. रोहिदास आल्हाट यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.