राज्यात 2 लाख कोटींची नवी गुंतवणूक, 3 लाख तरुणांना रोजगार मिळणार
वृत्तसंस्था
शबनम न्यूज : मुंबई (दि.२२ फेब्रुवारी) :- महाराष्ट्र 2025 मध्ये संपन्न आणि समृद्ध असेल. गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडीने केलेल्या प्रयत्नांची फळे दिसून येतील. कोरोनामुळे बराच काळ वाया गेला. पण आम्ही हातावर हात ठेवून बसलो नाही.महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही . आम्ही परदेशी आणि देशातील उद्योजकांसोबत करार केले. 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येत आहे. प्रकल्प येणार याची खात्री करूनच आम्ही करारावर सह्या केल्या आहेत. या प्रचंड मोठ्या गुंतवणुकीमुळे राज्याचं अर्थकारण वाढेल. तीन लाख तरुण तरुणीला रोजगार मिळणार आहे. रोजगार निर्मिती होते हे महत्त्वाचं आहे. नव्या गुंतवणुकीमुळे हे शक्य होणार आहे, असं राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं.
कोणत्याही राज्यात उद्योजक येत असताना ते संपूर्ण परिस्थितीची पाहणी करत असतात. सोयी सुविधा आहेत का? याची माहिती घेत असतो. गुंतवणूकदाराचं मनोधैर्य त्यामुळे वाढतं. बंदर किती जवळ आहे, रेल्वे, रस्ते वाहतुकीचं जाळं आहे की नाही हे पाहून मोठे निर्णय घेतले जातात. महाराष्ट्रात या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे हे करार झाले आहेत. आम्ही उद्योगाची काही क्षेत्रे निवडली आहेत. आम्ही ती विकसीत कसे करता येईल हे पाहत होतो. औरंगाबादमध्ये आम्ही औद्योगिक नगरी तयार केली आहे.असं सुभाष देसाई यांनी सांगितलं.