शबनम न्यूज : आळंदी (दि.२६ फेब्रुवारी) :- शिक्षण महर्षी स्व. विलासराव तांबे फौंडेशन व श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, पुरस्कृत, शिक्षण महर्षि स्व. विलासराव तांबे यांच्या ११ व्या पुण्यस्मरणानिमित्त, ज्ञानविलास आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा, शुभहस्ते मा. गणपतराव फुलवडे (मा. जि. प. उपाध्यक्ष) व मा. पांडुरंग पवार ( जि. प. सदस्य) पुरस्कार देऊन , शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी, डुंबरवाडी, पो. खामुंडी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, मा. कृष्णराव पाटील ( ज्येष्ठ संचालक, गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ) हे होते. या पुरस्काराचे स्वरूप शाल, बुके व स्मृतिचिन्ह देऊन डॉ. पांडुरंग उत्तमराव मिसाळ, (शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमती नीलमताई विलासराव तांबे, (संचालिका), श्री. श्रीहरी भाऊसाहेब तांबे, (उपाध्यक्ष), श्री. वैभव विलासराव तांबे- (सचिव), श्री. मयूर मुरलीधर ढमाले(खजिनदार), प्राचार्य डॉ. हंसराज थोरात ( शरदचंद्र पवार महाविद्यालय), तसेच गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळातील, सर्व प्राचार्य, प्राध्यापकवृंद व शिक्षेकेत्तर कर्मचारीही उपस्थित होते. त्याच बरोबर माझी पत्नी प्रा. मनिषा पांडुरंग मिसाळ, माझी कन्या, चि. भक्ती पांडुरंग मिसाळ व काका श्री. भगवानराव मिसाळ, (मा.पी.एस. आय. मुंबई) इत्यादी उपस्थित होते. ज्ञानविलास आदर्श शिक्षक , आचार्य श्री, हा पुरस्कार संस्था अंतर्गत दिला जातो. प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालय व संस्थेसाठी नि:स्वार्थपणे, भरीव स्वरूपाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्यामुळे संस्थेच्या व महाविद्यालयाच्या प्रगतीला हातभार लागलेला आहे. त्यांच्या कामाची दखल घेत, त्यांना अधिक प्रेरणा, प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचा अधिक आत्मविश्वास वाढविण्यासाठी, त्यांना संस्था पुरस्काराच्या रूपाने शब्बासकी देत असते. त्यांच्या कामाचा गौरव करीत असते.
हा आचार्य श्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृतज्ञतेची भावना व्यक्त करताना, डॉ. पांडुरंग उत्तमराव मिसाळ, यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले, ‘शिक्षण म्हणजे स्वतःच्या क्षमतेची ओळख, शिक्षण म्हणजे स्वतः, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं, शिक्षण म्हणजे कष्ट करू शकण, शिक्षण म्हणजे चांगला माणूस होणं, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं, शिक्षण म्हणजे ज्ञान आत्मसात करणं, शिक्षण हा जीवन पुष्पांचा सुगंध आहे. जीवन विणेचे ते छडलेले सप्तस्वर आहेत. इंद्रधनुष्यातील रंगाची तालबद्ध पावलांनी केलेली ती उधळण आहे. शिक्षण हा जीवनाचा श्वास आहे. नव्हे नव्हे शिक्षण हा जीवनाचा प्राण, आत्मा आहे. याप्रमाणे ज्यांनी शिक्षणाला जीवनाचे सार सर्वस्व मानले. त्यांची कर्मभूमी ही, प्राचीन-अतिप्राचीन काळापासून ऋषीमुनींच्या तसेच साधू तपस्वी यांच्या पादस्पर्शाने, वास्तव्याने व घनघोर तपश्चर्याने, कला सौंदर्य व सृष्टी सौंदर्य यांच्या सुरेख संगमाने पवित्र, मंगल, पुनीत बनलेली आणि विश्व संत महाराष्ट्रभूषण, महान भगवद्भक्त संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे परम सद्गुरु, बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधीने पवित्र झालेली ही ओतूरची भूमी आहे. या भूमीमध्ये, ‘महिलांसाठी शिक्षण, सर्वांसाठी शिक्षण’ हे ब्रीदवाक्य घेऊन, या ध्येयाने प्रेरित होऊन, संपूर्ण जीवन समर्पित करणारे, ‘शिवनेर भूषण’, शिक्षण महर्षि स्व.विलासराव तांबे,(संस्थापक, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, ओतूर, जि. पुणे). शिक्षण हा त्यांना आपल्या जीवनाचा श्वास, प्राण व आत्मा वाटत होता. त्यासाठीच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले होते.
त्यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मी अतिशय गरीब, शेतकरी कुटुंबातील, दुर्गम ग्रामीण भागातील, आई-वडिलांना कसलाही शिक्षणाचा गंध नाही. आपल्या मुलानं शिकावं ही तीव्र इच्छा होती. एक ऊस तोडणी कामगाराचा मुलगा, शिक्षण काही काळ खंडित झालेला. आळंदीमध्ये धर्मशाळेमध्ये राहून, माधुकरी मागून उदरनिर्वाह करायचा, स्वावलंबनातून, वारकरी सांप्रदायीक शिक्षण घेत. M. A,, M. Phil., Ph. D., Net. शिक्षण घेऊन प्राध्यापक-२० वर्षे व प्र. प्राचार्य म्हणून १२ वर्षे, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव (आळंदी), जि. पुणे. येथे अध्यपनाचे काम करीत,कार्यरत आहे.
माझ्या जीवनाला शिक्षण महर्षी स्व. विलासराव तांबे यांच्या जीवनाचा परिसस्पर्श झाला, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला व या पदाची जबाबदारी दिली. त्यांच्या विश्वासाला, शब्दाला पात्र ठरण्यासाठी, अतिशय अभ्यास, खडतर कष्ट, प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, सचोटी, मेहनत व परिश्रम घेतले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार आणि उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुरस्कार प्राप्त झाला. तसेच आळंदीमधील, युवा वारकरी गौरव पुरस्कार, मुंबईमधील वारकरी संप्रदाय भूषण, शिवाजी विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू, अशोक भोईटे यांच्या यांच्या शुभहस्ते व असे अनेक पुरस्कार मिळाले असले तरी माझ्या संस्थेने, माझ्या कुटुंबातील, माझ्या घरातील, माणसांनी, माझ्या कामाची दिलेली ही पोहोच पावती आहे. हा मिळालेला आचार्यश्री पुरस्कार, याचे माझ्या दृष्टीने सर्वात अधिक मूल्ये आहे. या पुरस्काराने मला प्रेरणा, प्रोत्साहन मिळालेले आहे. माझ्या अंगात हजार हत्तीचे बळ आलेले आहे. माझी कामाची जबाबदारी अधिक वाढलेली आहे , याचीही जाणीव मला आहे. मी पुन्हा एकदा कृतज्ञतेची भावना व्यक्त करून हा पुरस्कार ज्यांनी मला मधुकरी दिली व धर्मशाळेत आश्रय दिला. आदरणीय रासेकर व पिंपळगावकर ग्रामस्थ, तसेच माझ्या महाविद्यालयातील सर्व प्राचार्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना कृतज्ञतेने समर्पित करतो. अशी माहिती प्रसिद्धी विभाग, प्रमुख प्रा. प्रविण डोळस व प्रा. माणिक कसाब यांनी दिली.