पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट
शबनम न्यूज : नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दि.१० मार्च
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. पाच राज्यांतील ६९० जागांसाठी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली.
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कडवी झुंज देऊनही भाजप सत्तेत वापसी करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आम आदमी पार्टी (AAP) पंजाबमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडवत इतिहास घडून आणला असताना भाजप उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येईल, असे चित्र आहे. भाजप यूपीमध्ये ४०३ जागा पैकी २६० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे तर पंजाब मध्ये ११७ जागा पैकी AAP ९० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे.
उत्तराखंडमध्ये भाजपने ७० पैकी ४६ हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. ईशान्येकडील मणिपूर राज्यात, भाजपने ६० पैकी २६ पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे.
गोव्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या जवळ आहे. भाजपने १९ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा ३ जागांवर तर आम आदमी पक्षाचा २ जागांवर विजय निश्चित आहे. सध्याच्या कलानुसार गोवा फॉरवर्डला १ जागेवर आणि आरजेपीला १ जागेवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. ३ जागांवर अपक्ष उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.