शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड आपच्या वतीने मणिपूर मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. आप पक्षाच्या वतीने मणिपूर मध्ये घडलेल्या घटनेचे, हिंसाचाराच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने संपूर्ण देशासह राज्यातील नागपूर, अमरावती ,जळगाव, सांगली, पुणे आणि छत्रपती संभाजी नगर या शहरात मोठ्या संख्येने आक्रोश कॅण्डल मार्च काढण्यात येत आहे. या आक्रोश कॅन्डल मार्च मध्ये मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पिंपरी चिंचवड आप ने सहभाग नोंदविला आहे.
यावेळी बोलताना आपचे पिंपरी चिंचवडचे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे म्हणाले, मणिपूर भारतात आहे की नाही, असा प्रश्न मागील अनेक दिवसापासून देशाच्या वासियांना पडला आहे. तेथे दोन स्त्रियांना विवस्त्र करून धिंड काढून त्यांच्या देहाची विटंबना केली गेली. सामूहिक बलात्कार केला गेला. मानवतेला काळिमा फासणारी आणि क्रौर्याची परिसीमा गाठणारी मे महिन्यातील ही घटना उशिरा जरी उघड झाली असली, तरीही आपल्या देशातील भाजपा सत्ताधारी आपल्या मस्तीत आणि मन मर्जीच्या तालात दंग आहेत. मणिपूर मधील हा व्हिडीओ घराघरांतील अनेकांनी पाहिला, पण डोळ्यांत आलेले पाणी पुसण्याव्यतिरीक्त कोणीही काही करू शकलेले नाही.मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे.पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींना मोकळीक दिली असे तरी सध्या दिसते आहे ह्या हिंसाचाराविरोधात आम आदमी पार्टीने संपूर्ण देश्यासह, राज्यात नागपूर, अमरावती,जळगाव, सांगली, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या शहरात मोठ्या संख्येने “आक्रोश कॅडल मार्च” काढला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर जळत आहे, परंतु केंद्रातील व राज्यातील मोदी सरकार कोणतीच कारवाई करत नव्हते. त्याचाच फायदा घेऊन महिलांना विवस्त्र फिरवून त्यांच्यावर बलात्कार करण्यापर्यंत त्या आरोपींची मजल गेली आहे. भाजपचे राज्यकर्ते अपयशी ठरल्याचे बघता,लोकांनी दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार संपूर्ण देशातील जनतेला मान खाली घालावी लागेल असाच आहे.