शबनम न्यूज : पुणे (दि.२६ मार्च) :- गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल सभागृहात माहिती दिलेली आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना ३१ मार्चपर्यंत कामावर परतण्याचं आवाहन परब यांनी केलं. उर्वरीत मागण्यांवर चर्चेची सरकारची तयारी असल्याचंही परब यांनी काल विधान परिषदेत स्पष्ट केलं. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच मुद्द्यावर मोठं विधान केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपावर गेलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं. परीक्षा सुरू आहे. विद्यार्थ्यांना एसटीची गरज आहे. अनेक विद्यार्थी अडचणीच्या भागातून येतात. त्यांना दुसरं वाहन परवडत नाही, त्यामुळे एसटी कामगारांना विनंती आहे की त्यांनी कामावर परतावं. जे निलंबित झालेत, ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची संधी दिली आहे. 31 मार्च पर्यंत कुणाचं न ऐकता, आत्महत्येचा विचार न करता पुढे यावं आणि एसटीत रुजू व्हावं. तसेच आपलं आपलं काम सुरू करावं. 31 मार्चपर्यंत नाही ऐकलं तर स्पष्ट सांगतो जे येणार नाही, त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल. मग मात्रं त्यांना वेगळी संधी मिळणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. पुण्यात मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला.
ते बोलताना पुढे म्हणाले, एसटीचा प्रश्न सुटलेला आहे. अनिल परब यांनी काल समजूतदारपणे भूमिका घेतली. एसटी कामगारांना त्यांनी शेवटची संधी दिली आहे. एसटी कामगारांना जवळपास सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेलं आहे. त्यांची पगारवाढ केली आहे. पूर्वी पेक्षा त्यात साडेसातशे कोटी रुपये वर्षाला वाढ झाली आहे. कामगारांना 10 तारखेपर्यंत पगार देण्याची जबाबादारीही सरकारने घेतली आहे. त्यामुळे कामगारांनी आता कामावर रूजू व्हावं, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.