शबनम न्यूज : मुंबई (दि.३१ मार्च) :- एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनुसार ३९ कोटी रुपये आज महामंडळाला वितरीत करण्यात आले असून या निधीतून एसटीच्या ३०० बसगाड्यांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विद्यार्थींनींना बारावीपर्यंत शिक्षणासाठी गाव ते शाळेदरम्यान वाहतुक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते, त्या उद्दीष्टपूर्तीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. सद्यस्थितीत योजनेंतर्गत महामंडळातर्फे ८७२ बसगाड्या चालवण्यात येतात.
महामंडळाला वर्ष २०११ ते २०१३ या कालावधीत टप्प्याटप्प्याने प्राप्त झालेल्या व ॲल्युमिनियम धातूत बांधलेल्या ६२५ बसगाड्यांपैकी ज्यांची बांधणी नादुरुस्त स्थितीत आहे अशा ३०० वाहनांची पहिल्या टप्प्यात पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरण करण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत प्रतीवाहन १३ लाख रुपये खर्च करुन बसगाड्यांच्या पुन:स्थितीकरणाचे काम करण्यात येणार आहे. राज्य शासनाने ३९ कोटी रुपयांचा निधी वितरीत केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष करुन विद्यार्थीनींचा एसटी प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.