शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ एप्रिल) :- मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अजान साठी असणारे भोंगे 03 मे पर्यंत काढावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हनुमान चालीसा लावणार असल्याचे सांगितले आहे. राज ठाकरे यांनी वारंवार धार्मिक तेढ निर्माण होईल असे भाष्य केले आहे. मशिदींवरील भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभरातील मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मात्र या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत शहरात भोंगे लावणार नसल्याचं जाहीर केलं. त्यांनतर पुणे शहर अध्यक्षपदावरून मोरेंना काढण्यात आले. त्यांनतर ते म्हणाले होते कि, ”मी एक लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका लक्षात घेतली तर १५ वर्षे ज्या भागात लोकप्रतिनिधित्व करतोय त्याठिकाणी सर्व मुस्लिम बांधव माझ्या सोबत आहेत. त्यांचे आणि माझे जवळचे संबंध आहेत. त्या भाषणानंतर ती लोक दहशतीखाली गेली आहेत. ज्यांना आम्ही चाचा, मामु, खाला म्हणत मोठं झालोय. ती लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागली आहेत. त्यामुळे मन व्यथित झाल्याची प्रतिक्रिया मोरे यांनी दिली होती.
परंतु, याबाबत पिंपरी-चिंचवड शहराचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले हे आपली याबाबतची भूमिकां स्पष्ट करण्यात असमर्थ दिसले. त्यांच्याशी शबनम न्यूज च्या प्रतिनिधींनी संपर्क साधून आपण राज ठाकरे यांच्या मतांशी सहमत आहात का? असे विचारले असता, त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. यापूर्वी हि सचिन चिखले यांनी राज ठाकरेंच्या या विधानाबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, मी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे, असे सांगून त्यांनी आपली प्रतिक्रिया देण्याचे टाळले. याचा अर्थ असा होतो की, सचिन चिखले हे राज ठाकरे यांच्या विधानाशी सहमत नसून ते खुल्या आवाजात त्यांच्या या विधानाचा विरोध करू शकत नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना मुस्लिम मतदारांमध्ये आपली प्रतिमा मलीन करायची नसेल. तसेच राज ठाकरे यांच्या विरोधात ही जायचे नाही. या हेतूनेच त्यांनी राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
वास्तविकपणे रीतसर परवानगी घेऊन कुठल्याही धार्मिक स्थळांवर आपण स्पीकर अथवा भोंगे लावू शकता. (आरक्षित शांतता क्षेत्र सोडून) त्याचा आवाज ७५ डेसीबल पेक्षा कमी असावा.जर अनधिकृत भोंगे किंवा स्पीकर लावले असतील किंवा नियमांचे पालन केले गेले नाही तर १ लाखांपर्यंत दंड आणि ५ वर्षांपर्यंत कैद अशी शिक्षा होऊ शकते. आणि हा कोर्टाचा निकाल सर्वच धर्मीयांसाठी आहे जो कोर्टाने १६ ऑगस्ट २०१६ रोजी दिलेला आहे. ज्या ठिकाणी अनधिकृत (म्हणजेच कायदेशीर परवानगी न घेता) स्पीकर किंवा भोंगे लावले असतील कृपया त्याची रीतसर परवानगी घ्यावी आणि मगच ते लावावे. जर परवानगी घेतली नसेल तर धार्मिक स्थळांवरील स्पीकर किंवा भोंगे काढून टाकावे. जर काढले जात नसतील तर प्रशासनाने अशा धार्मिक स्थळांवर कारवाई करावी. आमचा या गोष्टीला नक्कीच पाठिंबा राहील. आणि यात कसलाही दुजाभाव अजिबात करू नये. कारण हा विषय ध्वनिप्रदूषणाशी निगडित आहे.