वृत्तसंस्था
शबनम न्यूज : नवी दिल्ली (दि.२५ एप्रिल) :- महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आज दि २५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु आज होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पुढची सुनावणी आता ४ मे रोजी पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण मिळणार की नाही यासाठी ही सुनावणी महत्त्वाची मानली जाते.
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विशेष कायदा पारित करत निवडणुकांच्या तारखा प्रभाग रचना करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत त्याला आव्हान देत १३ याचिका दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘ओबीसी’ आरक्षणाबाबत दाखल असलेल्या याचिकांवरील सुनावणी ४ मे पर्यंत पुढे गेल्याने राज्यातील महापालिकांच्या निवडणुका लांबणीची शक्यता अधिक बळावली आहे.
राज्यातील पुणे, पिंपरी- चिंचवड सह बड्या महापालिकांच्या निवडणुका या आतापर्यंत फेब्रुवारी-मार्च महिन्यांतच घेण्यात येत होत्या. या निवडणुका लांबल्याने त्या आता मे-जून महिन्यात होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतानुसार १५ जूननंतर निवडणुका घेण्यात येत नाहीत. पावसाळ्यामुळे या निवडणुका घेण्यास मर्यादा येतात. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ४ मे च्या सुनावणीदरम्यान काही ठोस आदेश दिले, तरच या निवडणुका जून महिन्यात होण्याची शक्यता आहे; अन्यथा या निवडणुका घेणे अडचणीचे असल्याने त्या आता दिवाळी दरम्यान ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे.