शबनम न्युज | पिंपरी
मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीचा इतिहास आणि वाटचाल समजून घेतली पाहिजे. संत, महात्मे, थोर पुरुषांमुळे महाराष्ट्राची जगात आगळी वेगळी ओळख आहे. ही महाराष्ट्राची देण आहे. आपण महाराष्ट्राच्या मराठी मातीत असल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे, असे मत नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी व्यक्त केले.
चिंचवड संभाजीनगर येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांस्कृतिक विभागातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त शनिवारी (दि.३०) विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमित गोरखे बोलत होते. या प्रसंगी मुख्याध्यापिका डॉ. मानसी हसबनीस यांच्यासह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. अमित गोरखे पुढे म्हणाले की, “आधुनिकतेची कास धरत असताना महाराष्ट्राच्या मातीतील परंपरा, संस्कृती समजून घेतली पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्रासाठी मोठं जनआंदोलन उभं राहिलं. १०६ जणांना प्राण गमवल्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्र राज्य मिळाले. महाराष्ट्र दिन साजरा करताना महाराष्ट्राच्या निर्मितीचा आणि वाटचालीचा इतिहास विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिले. गणेशभक्त मोरया गोसावी यांच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडची एक वेगळी ओळख आहे. त्या प्रमाणे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या संत, महात्मे, थोर पुरुषांमुळे महाराष्ट्राची जगात आगळी वेगळी ओळख आहे. ही महाराष्ट्राची देण आहे. याचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे. त्यातून आपल्या सर्वांगीण ज्ञानात भर पडत असते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारातून महाराष्ट्र संस्कृती, परंपरा आणि सर्व बोली भाषाचं दर्शन झालं. पालकांकडून अशा उपक्रमांना दिलेले प्रोत्साहन महत्त्वाचे आहे. या सगळ्याचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत होईल”.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा एका विद्यार्थ्याने केली होती. महाराष्ट्र दिन विषेश गीत, महाराष्ट्र दर्शन नृत्य, दक्षिण महाराष्ट्रातील शेतकरी नृत्य, जोगवा नृत्य, कोकणातील कोळी नृत्य, विदर्भातील तारपा नृत्य, वाघ्या मुरळी नृत्य, धनगर नृत्य, जय जय महाराष्ट्र असे विविध कलाविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच, नाटकांच्या माध्यमातून मराठी भूमीचा इतिहास व वाटचाल सर्वांसमोर उलगडण्यात आली. विद्यार्थ्यांचे पालक गितांजली मोरे, स्मिता शिंदे, अश्विनी कडते, कविता भांडारकर यांनी नृत्य सादर केले. विद्यार्थी दिशा पवार, मंगेश ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. कांचन पवार यांनी आभार मानले.