ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या ‘मनातला पाऊस’ पुस्तकाचे प्रकाशन
शबनम न्युज | मुंबई
जो लिहितो तोच लेखक आहे असे नाही तर जो विचार करतो, जो काही तरी सांगू पाहतो तो खऱ्या अर्थाने लेखक असतो. आपल्या मनात आलेले विचार सहजपणे सुचणे आणि लिहिणे यासारखा सुंदर उपक्रम असू शकत नाही. कारण याच लेखनाच्या माध्यमातून आपण सहजपणे अनेक पिढ्यांशी जोडले जातो असे लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते, साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या “मनातला पाऊस” या अरुण शेवते संपादीत ऋतूरंग प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात दिग्दर्शक, कवी नागराज मंजुळे यांच्या हस्ते आणि मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात झाले. या प्रकाशन सोहळ्यास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार विनायक राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मंजुळाताई गावीत, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार दिपक केसरकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार शेखर निकम, आमदार महेंद्र थोरवे, आमदार किशोर जोरगे, ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अंबरीश मिश्र, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील, लेखक विश्वास पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंजुळे म्हणाले, फॅंड्री केल्यानंतर अनेक लोकांचा संपर्क येऊ लागला. गडाख कुटुंबियांशी माझी त्यानंतर ओळख झाली. यशवंतराव गडाख यांना मी गेल्या 9 ते 10 वर्षांपासून ओळखत असून प्रत्येक वेळी त्यांना भेटल्यावर मला त्यांच्याबद्दल वेगळा जिव्हाळा वाटतो. आज त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले, हा माझा सन्मान वाटतो.
समाजात राहताना संवेदनशील असणे गरजेचे आहे. या पुस्तकातून यशवंतराव स्वत: बोलल्याचा भास होतो.