शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झाला पाहिजे, असा मनापासून विचार करणारा राज्यात राष्ट्रवादीशिवाय इतर पक्षात कोणताही नेता नाही. हे माझे शहर आहे ही भावना असावी लागते, ती भावना केवळ आपल्याकडे आहे. भाजपच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत शहरात येऊन किती प्रकल्पांची माहिती घेतली? नविन किती प्रकल्प आणले, शहराच्या विकासात त्यांचे योगदान काय आहे? याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी द्यावे, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (दि.३) भाजप नेत्यांना दिले. महापालिका निवडणुकीपूर्वी अजितदादांनी भाजपवर सडकून टीका करत महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमास शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, रविकांत वर्पे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर यांच्यासह तीनही विधानसभेचे अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे आजीमाजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपाची गेली पाच वर्षे सत्ता होती. या पाच वर्षांत भाजपने काय केले. आमच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड शहर देशातील सर्वाधिक वेगाने विकसीत होणारे शहर होते. भाजपच्या नेत्यांनी खोटी आश्वासने देऊन महापालिकेची सत्ता पदरात पाडून घेतली. मात्र गेल्या पाच वर्षांत त्यांचे शहराच्या विकासात काय योगदान आहे. त्यांचा कोणता नेता शहरातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आला? याचे उत्तर भाजपनेत्यांनी शहरवासियांना द्यावे. शहराच्या विकासासाठी वेळ देणारे आणि या शहराच्या प्रगतीसाठी मनापासून विचार करणारे नेतेच त्यांच्याकडे नाहीत. केवळ ऑनलाईन उद्घाटने करून स्टंटबाजी करणारी ही मंडळी आहेत. मात्र, आपणाला या शहराचे सर्व प्रश्न सोडवायचे असून शहरातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचवायचा आहे. शहर विकासासोबतच इथल्या तरुणांच्या हाताला काम आणि महिलांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जाईल.
भाजपने गेल्या पाच वर्षांत प्रचंड भ्रष्टाचार केला. ज्या कामांमुळे शहराचा विकास होणार आहे, जनतेचे कल्याण होणार आहे, अशा कामांना भाजपच्या काळात महत्त्व न मिळता ज्या कामांमध्ये भाजपच्या लोकांचा ‘इंट्रेस’ आहे, ज्यामध्ये त्यांना कमिशन मिळाले ती कामे गेल्या पाच वर्षांत करण्याचा प्रकार घडला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी कररुपाने जमा केलेल्या पैशांचा विनियोग विकासकामांसाठी होण्याची गरज होती मात्र तसे झालेले नाही. कुत्र्याच्या नसबंदीमध्ये साडेसहा कोटींचा भ्रष्टाचार हा वेगळाच प्रकार आहे. करोनाकाळात केलेल्या नसबंदीसाठी काय सोन्याची उपकरणे वापरली होती काय? असा प्रश्नही अजितदादांनी यावेळी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, आमच्या सत्ताकाळात शहराचा जो विकासाचा वेग होता त्याला गेल्या पाच वर्षांत खिळ बसली आहे. आपल्याला गेल्या पाच वर्षांत शहराचा जो विकासात जो विकासाचा बॅकलॉग निर्माण झाला आहे, तो भरून काढावयाचा आहे. त्यामुळे आपली महापालिकेत सत्ता नसतानाही पालकमंत्री या नात्याने शहराच्या विकासाला गती देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
महापालिकेत सत्ता आल्यास शहरवासियांना दर्रोज पाणी
‘ज्यांच्या अंगात पाणी नाही, ते शहरवासियांना काय पाणी देणार’ महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचे शंभर नगरसेवक निवडून द्या, दर्रोज पाणीपुरवठ्यासह शहरातील सर्वच्या सर्व सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आम्ही कधीही स्टंटबाजी करत नाही. आमच्यामध्ये प्रश्न सोडविण्याची आणि शहराचा विकास करण्याची धमक असल्यामुळे नागरिकांनी आम्हाला महापालिकेत संधी द्यावी, असे आवाहनही अजितदादांनी यावेळी केले. शहरवासियांना भाजपचे पदाधिकारी गेल्या पाच वर्षांत दररोज पाणीदेखील देऊ शकले नाहीत. टक्केवारी, भ्रष्टाचार यामध्येच या लोकांचा वेळ गेल्याने पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. आमची सत्ता आल्यास आम्ही शहरातील सर्व प्रश्न सोडविण्याबरोबरच दर्रोज पाणी देण्यासाठी कटीबद्ध आहोत. अत्यंत नियोजबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने सत्ता येताच आंद्रा आणि भामाआसखेड धरणातून 265 एमएलडी पाणी उचलले जाईल आणि शहराचा पाणीप्रश्न सोडविला जाईल, असेही अजितदादा यावेळी म्हणाले.
विरोधकांच्या चक्रव्युहात अडकू नका
सध्या देशात, राज्यात आणि शहरात विरोधकांच्या माध्यमातून जाती-धर्मामध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यापासून लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. मात्र आपल्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकाराकडे दूर्लक्ष केले पाहिजे. शहर विकासाचा अजेंडा आपल्या हाती घेऊन चुकीच्या गोष्टींना थारा न देता विरोधकांच्या चक्रात अडकू नका, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. ते म्हणले, विरोधकांकडून केवळ आश्वासने दिली जातात, लोकप्रिय घोषणा केल्या जातात. सत्ता आली की त्यातील एकही आश्वासन पूर्ण केले जात नाही. आपण असे न करता जे होऊ शकते त्याचा आराखडा तयार करून शहर विकासाला एक नवी दिशा देण्याबाबत काम करायचे आहे. समोरच्यांनी जातीधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करावे मात्र घसरू नये, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.
मतदारराजा जागृत हो
भारतातील मतदारराजाने यापूर्वी ज्यांनी ज्यांनी चुका केल्या त्यांना शिक्षा दिली आहे. इंदिरा गांधी यांनासुद्धा पराभव पहावा लागला होता. आताचे वातावरणही चुकीच्या दिशेने चालले आहे. दुसऱ्याला त्रास देण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिला नाही. मात्र सत्तेच्या जोरावर भलतेच सुरू आहे. देशातील सुजान नागरिकांनी विचार करण्याची आणि जागृत होण्याची वेळ आली आहे. महागाईने नवे उच्चांक केले आहेत. श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. एका रात्रीत होत्याचे नव्हते होऊ शकते. त्यामुळे देशातील सुजान नागरिकांनी आता खऱ्या अर्थाने विचार करून योग्य आणि जबाबदार व्यक्तींच्या हातीच सत्ता सोपविली पाहिजे, असेही अजितदादा यावेळी म्हणाले.
लबाडा घरचं अवतानं
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्यावर नाव न घेता अजितदादांनी बोचऱ्या शब्दात टिका केली. ते म्हणाले, शहरात सध्या इव्हेंट सुरू आहेत. जेसीबी, मर्सिडिज देत आहेत. यांचे काही खरे नाही. एक वस्तू कितीजणांना दिली ते त्यांना माहित नाही. ते लबाडा घरचे अवतानं आहे. जेवल्याशिवाय कळत नाही, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा.
विकासाला मत न दिल्याची खंत
पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा मोठ्या प्रमाणात विकास केला मात्र गतवेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत आपल्या पक्षाचा पराभव झाला याची खंत असल्याचे अजितदादांनी यावेळी बोलून दाखविले. एवढा मोठा विकास केल्यानंतरही नागरिकांनी विकासकामे करणाऱ्यांना मत न दिल्याबद्दल खंत वाटते, असे अजितदादा म्हणले. खोटा प्रचार, मोदी लाट याचा परिणाम गतवेळी झाला. यावेळी मात्र राष्ट्रवादीने केलेला विकास आणि भाजपने केलेला भ्रष्टाचार याचा विचार करून जनतेने मतदान करावे, असे आवाहनही अजितदादा यांनी यावेळी केले.