शामभाऊ जगताप यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपळे गुरव परिसरातील महापालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेली कामे गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहेत. तर काही नगरांमधील कामे पूर्ण झालेली आहेत. परंतु ज्या ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत, त्या ठिकाणी राडारोडा, वाळू, विटा, सिमेंट ब्लॉक अस्ताव्यस्त पडलेले आहेत. परिणामी पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शामभाऊ जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना समस्यांच्या छायाचित्रांसह निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पवन साळुंखे उपस्थित होते. शामभाऊ जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे, की पिंपळे गुरवमधील काशीद पार्क चौकातील पदपथाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अपूर्ण आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याची येथील ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केली आहे. याबरोबरच भगतसिंग रोड चौकातील विद्युत डीपीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. विद्युत केबल उघडी आहे. प्रभातनगर गल्ली नंबर 1 मधील माती रस्त्यावर आल्याने रस्ता बंद आहे. सुदर्शननगर चौकात 8 गार्डन शेजारी धोकादायक खड्डा आहे. जगताप पाटील पेट्रोल पंप रस्त्यावरील फूटपाथवर मातीचे ढिगारे आहेत. कल्पतरू इस्टेट सिग्नल चौकामध्ये चेंबर उघड्या अवस्थेत आहे. तुळजाभवानी मंदिराच्या शेजारी धोकादायक खड्डा आहे. शिवाजी चौकातील कामही अपूर्ण असून चेंबर उघड आहे. महादेव मंदिर येथे चेंबरला फ्रेम नाही. मारुती मंदिरामागे चेंबर उघडा आहे. अशी विविध कामे अपूर्णावस्थेत असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ही कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशी मागणीही शामभाऊ जगताप यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
पावसाळय़ात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी पावसाळापूर्व कामे करण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी ती खूपच संथ गतीने सुरू आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली कामेही बहुतांश ठिकाणी अपूर्ण आहेत. स्ट्रोम वॉटर पाईप लाईनची साफसफाईही अद्याप झालेली दिसून येत नाही. अनेक ठिकाणी चेंबरची झाकणे उघड्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत पिंपळे गुरवमधील नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. त्यामुळे ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणीही शामभाऊ जगताप यांनी केली आहे.