शबनम न्युज | मुंबई
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरेसरकारने अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला मंजूर दिली. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्वपूर्ण मंत्रीमंडळ बैठकीत अपेक्षेप्रमाणे नामांतराचे मोठे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, औरंगाबाद शहराच्या “संभाजीनगर” नामकरणास आणि उस्मानाबाद शहराच्या “धाराशीव” नामकरणास मान्यता देण्यात आली आहे.
हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.
एकीकडे शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आल्याचे सांगितले जात आहे. भाजपने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र देऊन बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.